...अन्यथा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: August 18, 2023 18:38 IST2023-08-18T18:38:10+5:302023-08-18T18:38:21+5:30

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवेंचा शासनाला इशारा

...otherwise will starts street fight for Marathwadas rightful water: Ambadas Danve | ...अन्यथा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

...अन्यथा मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने पळविले आहे. नांदूर,मधमेश्वरसाठी बांधलेल्या चार धरणातून ३०० द.ल.घ.मी.पाणी बंधनकारक असताना या पाण्यावर पिण्याच्यावर आरक्षण टाकण्यात आले आहे. हक्काचे पाणी मिळावे,अशी मराठवाड्याच्या जनतेची मागणी आहे. यासाठी विरोधीपक्षनेते म्हणून शासनास विनंती करू, ही विनंती मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू,असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शासनाला दिला.

आ.दानवे यांनी गोदावरी  मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांची शुक्रवारी सिंचन भवन येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावर्षी मुबलक पाऊस न पडल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के जलसाठा आहे.गतवर्षी आजच्या दिवशी ८७ टक्के जलसाठा होता. अन्य धरणांतही अल्पजलसाठा आहे. यापार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील मंजूर लहान,मोठी आणि मध्यम धरणांची काय परिस्थिती आहे, किती प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत, किती प्रकल्पांची कामे यावर्षी पूर्ण होतील.तसेच दोन्ही जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचे दानवे म्हणाले. नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला पाणी देण्याचे प्रस्तावित आहे,याविषयी माहिती घेतली.दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या विविध धरणांत वळविण्यात आले आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे,यासाठी शासनाला विनंती करणार आहे, यानंतरही त्यांनी न ऐकल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

नांदूर मधमेश्वरच्या हक्काचे ३०० दलघमी पाण्यावरही डल्ला
 कायम कमी पावसाची तालुके म्हणून   गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांची ओळख आहे. या तालुक्यांसाठी नांदूर- मधमेश्वर प्रकल्प बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात चार लहान मोठी धरणे बांधलली आहेत. या धरणांची एकूण साठवणक्षमता ३८३ द.ल.घ.मी. आहे. यातील ३०० दलघमी. पाणी नांदूर मधमेश्वर प्रकल्पासाठी राखीव आहे.असे असताना नाशिक शहर, सिन्नर आणि अन्य गावांसाठी पिण्याचे पाणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात नांदूर मधमेश्वरला केवळ १२०दलघमी पाणी मिळते. यातही उन्हाळ्यात ५ ते ५० टक्के पाण्याचा वहन तोटा होतो. 

Web Title: ...otherwise will starts street fight for Marathwadas rightful water: Ambadas Danve