भीषण अपघाताने छ. संभाजीनगर सुन्न; रिक्षा चालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू, दोघींची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:20 IST2026-02-03T13:19:20+5:302026-02-03T13:20:44+5:30
''मध्यरात्रीचा तो प्रवास ठरला अखेरचा..." छत्रपती संभाजीनगरजवळ अहिल्यानगर रोडवर रक्ताचा सडा

भीषण अपघाताने छ. संभाजीनगर सुन्न; रिक्षा चालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू, दोघींची मृत्यूशी झुंज
छत्रपती संभाजीनगर: शहरातील अहिल्यानगर रोडवर मंगळवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाने रस्त्यात उभ्या नादुरुस्त टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक रईस हासिम शेख (३५) आणि प्रवासी महिला रुक्मिणी येणगे (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन प्रवासी तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री १:५५ वाजता आकाश माळी यांनी फायर कंट्रोलला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अपघात इतका भीषण होता की रिक्षा चालक रईस शेख हे रिक्षाच्या पत्रात पूर्णपणे अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने रिक्षेचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढले आणि तातडीने घाटी रुग्णालयात हलवले.
दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी रईस शेख आणि रुक्मिणी येणगे यांना मृत घोषित केले. जखमींमध्ये शितल मोरे (२४) आणि पायल वरदे (१९, दोघी रा. रांजणगाव, वाळूज) यांचा समावेश आहे. या दोन्ही तरुणींची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
यांनी केले बचाव कार्य
मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी दीपराज गंगावणे आणि संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, महेंद्र खोतकर, छत्रपती केकान, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड आणि वाहन चालक चंद्रसेन गीते यांच्या पथकाने हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. या घटनेमुळे वाळूज एमआयडीसी आणि रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.