मुंबई मराठा समाजाची नाही का? शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 20:08 IST2025-09-01T20:06:10+5:302025-09-01T20:08:09+5:30
मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे.

मुंबई मराठा समाजाची नाही का? शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सवाल
छत्रपती संभाजीनगर: मुंबईत दाखल आंदोलक मराठा बांधवांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मुंबईकर करीत आहेत. मुंबई मराठा समाजाची नाही का असा सवाल विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे. आंदोलकांचा त्रास होत असेल तर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर मुंबईकरांनी दबाव आणावा, असेही त्यांनी सांगितले.
उद्धवसेनेचे नेते दानवे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची माहिती चार महिने आधीच सरकारला दिली होती. मात्र सरकारने खबरदारी घेणे आवश्यक होते. या आंदोलनामुळे मुंबईतील व्यवस्थेवर ताण पडला असू शकतो. मात्र यास सरकारच जबाबदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्याच्या घटनेकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी नेते जात असतात तेव्हा आंदोलकांनी सयंमाने व्यवस्थित वागावे ,असे आपले मत आहे.
ओबीसी महासंघ एरव्ही झोपलेला
मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहिर करा,असे सत्ताधारी म्हणत असतात, याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, तुमच्याकडे बहुमत असताना चार, सहा खासदार , १०आमदार असलेल्या शरद पवार यांचे मत कशाला हवं असा सवाल त्यांनी केला. राज्यसरकार केवळ राज्यात द्वेष आणि अशांतता निर्माण करीत असल्याचा थेट आरोपही दानवे यांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनविरोधात ओबीसी महासंघाची आज पुण्यात बैठक झाली याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, जरांगे यांनी आंदोलन सुरू केले तरच यांना जाग येते. एरव्ही ते लोक झोपलेले असतात.
मराठा समाजाला न्याय द्यावा
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची केलेली मागणी योग्यच आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबीच आहे. सरकारने जरांगे यांची मागणी मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा,असेही दानवे यांनी नमूद केले.