विक्रमी पाऊस तरीही गंगापूर, वैजापूर तालुक्यांत येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:53 IST2025-10-14T19:52:53+5:302025-10-14T19:53:03+5:30
दोन तालुक्यातील १२२ गावांसाठी ३०.५७५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित

विक्रमी पाऊस तरीही गंगापूर, वैजापूर तालुक्यांत येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या मध्यम आणि लघु प्रकल्पांतील पाणीसाठा ९४ टक्के इतका आहे. गतवर्षी हा पाणीसाठा २८ टक्के होता. भविष्यात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतील गावांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता भासू शकते. या अनुषंगाने जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने १२२ गावांसाठी ३०.५७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केले आहे. गंगापूर तालुक्यात ७२७ मि.मी.च्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३६ टक्के तर वैजापूर तालुक्यात ७३३ मि.मी.च्या तुलनेत १६६ टक्के पाऊस झालेला असतानाही येणाऱ्या उन्हाळ्यात टंचाईची शक्यता असल्याने जिल्ह्यातील पाटबंधारे, जलाशयातील आकस्मिक आणि पिण्याच्या पाण्याची गरज यावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली नियाेजन बैठक पार पडली.
नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून पाणी आरक्षित केले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराकरिता एकूण ३५.०४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठ्या प्रकल्पांचा मिळून एकत्रित पाणीसाठा हा जिल्ह्याच्या गरजेनुसार आरक्षित केला जातो. यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन इतर पाणी हे सिंचनासाठी वापरले जाते. या बैठकीला जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा अभियंता सब्बीनवार, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, आरडीसी जनार्दन विधाते, मजीप्राचे अभियंता विजय कोळी, कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्यासह जि. प., महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये उपलब्ध आहे. भविष्यातील पाण्याची गरज पाहता, काही तालुक्यांसाठी पाणी आरक्षित करण्याचे नियोजन जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने करावे.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
जिल्ह्यात १४१ टक्के पाऊस
३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५८१ मि.मी.च्या तुलनेत ८२४ मि.मी. म्हणजेच १४१ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. जुलै अखेरपर्यंत १२ हजार हेक्टरचे नुकसान झाले हाेते. २ लाख २५ हजार हेक्टरचे नुकसान सप्टेंबरच्या १८ दिवसांत झाले.
सरलेल्या पावसाळ्यात झालेला पाऊस......
तालुका...................झालेला पाऊस .......टक्के
छत्रपती संभाजीनगर... ७६७ मि.मी. ...... ११६ टक्के
पैठण... ९३७ मि.मी. ........... १६६ टक्के
गंगापूर... ७२७ मि.मी. .............. १३६ टक्के
वैजापूर... ७३३ मि.मी. .............. १६६ टक्के
कन्नड... ९७० मि.मी. .............. १७१ टक्के
खुलताबाद...९१५ मि.मी. ............ १३४ टक्के
सिल्लोड... ८४६ मि.मी. ...............१४९ टक्के
सोयगाव... ९४० मि.मी. ............ १३४ टक्के
फुलंब्री... ७२३ मि.मी. .............. ...... टक्के
एकूण... ८२४ मि.मी. ..............१४१ टक्के