कोरोनामुळे मालमत्ता करवाढ न करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:14+5:302021-02-05T04:14:14+5:30
पालिका प्रशासक: २५ टक्के वाढीचा प्रस्ताव तूर्तास बाजूला औरंगाबाद : कोरोना संसगार्मुळे व्यापारी, नागरिकांसह सर्व स्तरांतील घटकांना आर्थिक फटका ...

कोरोनामुळे मालमत्ता करवाढ न करण्याचा निर्णय
पालिका प्रशासक: २५ टक्के वाढीचा प्रस्ताव तूर्तास बाजूला
औरंगाबाद : कोरोना संसगार्मुळे व्यापारी, नागरिकांसह सर्व स्तरांतील घटकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षांत मालमत्ता करात २५ टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी फेटाळला आहे. महापालिकेच्या करनिर्धारक व संकलक विभागाने २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात २५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव प्रशासकांसमोर सादर केला होता.
कोरोना संसर्गानंतरची परिस्थिती आणि पार्श्वभूमीवर करवाढ न करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासक पांडेय यांनी गुरुवारी सांगितले. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यांत मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येतो. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन दरवाढ किती करायची याचा निर्णय होतो. पालिकेची निवडणूक न झाल्यामुळे प्रशासकीय कारभार सुरू असून यावर्षी प्रशासकांनी करवाढीचा प्रस्ताव बाजूला ठेवला आहे. तीन वर्षांपासून मालमत्ता कराची दरवाढ सुचविली जात असून तो प्रस्ताव गेल्या वेळेस सत्ताधाऱ्यांनी रद्द केला. यावर्षी पालिका प्रशासक निर्णय घेणार होते, परंतु त्यांनी देखील कोरोनामुळे दरवाढ केली नाही. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा नसल्यामुळे प्रशासकांसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यांनी देखील दरवाढ नाकारली. तीन वर्षांपासून स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने दरवाढ नाकारली. आधी शंभर टक्के कराची वसुली करा, त्यानंतर कराच्या दरात वाढ करा, असे आदेश गतवर्षी सत्ताधाऱ्यांनी दिले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
कोरोना संसगार्मुळे २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन होते. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांसोबतच समाजातील सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर मालमत्ता करात दरवाढ करण्याचा प्रस्ताव नामंजूर केल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.
---------
तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणाची आज सोडत
औरंगाबाद : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २९ जानेवारीला सोडत काढण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांकरिता स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींकरीता सोडत असणार आहे. तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ११४ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी सकाळी ११ वा. मौलाना आझाद संशोधन केंद्र, एन-१०, सिडको येथे काढण्यात येणार आहे. कोविड-१९ संसर्गजन्य आजारापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सॅनिटायझर, मास्कसह उपस्थित राहावे, असे तहसीलदार शंकर लाड यांनी कळविले आहे.
१२ कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव
औरंगाबाद : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील १२ कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट शिपाई प्रतिभा इंगळे, अशोक बोर्डे, उत्कृष्ट वाहनचालक सुभाष पवार, रामकिसन तोकले, उत्कृष्ट छायाचित्रकार ना. गो. पुठ्ठेवाड, विजय होकर्णे, उत्कृष्ट लिपिक शिवाजी गमे, मनिषा कुरूलकर, प्रसिद्धी कामकाज अमोल महाजन, अश्रूबा सोनवणे, वर्ग-दोन उत्कृष्ट म्हणून अधिकारी मीरा ढास, ‘वर्ग-१’चे उत्कृष्ट अधिकारी मुकुंद चिलवंत यांची निवड झाली. माहिती संचालक गणेश रामदासी यांनी या नावांची घोषणा केली. स्वच्छ कार्यालय म्हणून विभागातून जालना कार्यालयाची निवड झाली. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यसंस्कृती प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.