चिखलात लोळल्यानंतर खडीरोडवर नागरिकांचे उंटावर बसून आंदोलन; महिनाभरापासून यातना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:59 IST2025-06-16T12:57:37+5:302025-06-16T12:59:06+5:30
महिना उलटला, तरी कामाला मुहूर्त लागेना; रस्त्यामधील पाइपलाइन उखडून फेकली

चिखलात लोळल्यानंतर खडीरोडवर नागरिकांचे उंटावर बसून आंदोलन; महिनाभरापासून यातना
छत्रपती संभाजीनगर : देवळाई येथिल खडीरोडचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महिनाभरापूर्वी चिखल आंदोलन करण्यात आले होते. मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आंदोलनाला यशही आले. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. रस्ता खोदून अडथळा ठरणारी पाइपलाइन उखडून फेकली. परंतु, महिना उलटूनही खोदलेल्या रस्त्याचे काम जैसे थे आहे. त्यामुळे आता उंटावर बसून आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपशहर प्रमुख दिनेश राजेभोसले यांनी उंटावर बसून रविवारी खडीरोडवर आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणखीन एक प्रयोग महिनाभरातच करावा लागला आहे.
सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाल्यानंतरही या भागाला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दरवर्षी २० कोटींपेक्षा अधिक कर भरणाऱ्या नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. देवळाई रस्त्याला समांतर रस्ता म्हणून खडीरोड ओळखला जातो. काळ्या मातीचा हा रस्ता ६० फुटांचा व २ किमी अंतराचा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती झाल्या आहेत. गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुल, दुकाने, शाळा असल्याने हा रस्ता २४ तास वर्दळीचा आहे. परंतु, या रस्त्यावर साधा मुरूम देखील टाकण्यात आलेला नाही. थोडा पाऊस पडला तरी रस्त्यावरून वाहने चालविणे तर सोडाच पायी देखील चालता येत नाही. डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करण्यासाठी या भागातील नागरिकांनी मनपाकडे पाठपुरावा केला. नुकतेच या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. ४ कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम देवळाईतील प्रसिद्ध ठेकेदार करणार आहे. भूमीपूजन होताच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते.
रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मे महिन्यात चिखल आंदोलन करत केली होती. त्यानंतर ठेकेदाराने रस्ता खोदला. पावसामुळे रस्त्याचे काम बंद ठेवले असे सांगितले. सध्या रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाला असून नागरिकांना घराबाहेर पडणे ही अवघड झाले आहे.