वडिलांना डबा द्यायला निघालेल्या मनस्वीचा हायवाखाली चिरडून मृत्यू; ३ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:19 IST2026-03-19T16:18:30+5:302026-03-19T16:19:21+5:30
हिरापूरमध्ये अपघात : युवतीच्या मृत्यूनंतर स्थानिकांचा संताप; पोलिस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या, हायवाचालक, महापारेषण व महापारेषणच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

वडिलांना डबा द्यायला निघालेल्या मनस्वीचा हायवाखाली चिरडून मृत्यू; ३ जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात दाखल वडिलांना डबा देण्यासाठी निघालेली मनस्वी विजय गाडगे या युवतीने समोरून स्कूलबस आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. मात्र, महापारेषणचे कामाचा मुरूम टाकणाऱ्या हायवाचालकाने मागे न पाहता तिच्या अंगावर हायवा घातला. मंगळवारी सकाळी ११ वाजता हिरापूर शिवारातील या अपघातानंतर जखमी मनस्वीचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांसह नातेवाइकांनी महापारेषणसह हायवाचालकावर कडक कारवाईसाठी बुधवारी तीन तास चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देत संताप व्यक्त केला.
१७ वर्षीय मनस्वी हिरापूरमध्ये कुटुंबासह राहत होती. खासगी हॉटेलमध्ये व्यवस्थापक असलेले तिचे वडील विजय आजारी पडल्याने त्यांच्यावर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रुग्णालयात उपचार सुरू हाेते. मंगळवारी मनस्वी दुचाकीने वडिलांसाठी डबा घेऊन निघाली. परिसरातच एका शाळेजवळ अरुंद रस्त्यामुळे मनस्वी रस्त्याच्या कडेला थांबली. मात्र, तेथेच विजेचा खांब रोवण्यासाठी मुरूम हलवण्यासाठीच्या हायवाचालकाने मागचा अंदाज न घेता हायवा मागे घेत थेट मनस्वीच्या अंगावर घातला. यात तिची आई फेकली गेली तर मनस्वीचा कंबरेखालचा भाग चिरडला गेला. शासकीय काम असताना विनाक्रमांकाच्या हायवाचा वापर केला गेला.
जखमी अवस्थेत १८ किमी फिरावे लागले
स्थानिकांनी धाव घेत मनस्वीला हिरापूरपासून ११ किलोमीटर अंतरावरील चिश्तिया चौकातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. परिणामी, मनस्वीला तेथून ६.४ किलोमीटर अंतरावरील घाटी रुग्णालयात न्यावे लागले. गंभीर जखमी अवस्थेतही १८ किलोमीटरच्या प्रवासामुळे उपचारांस विलंब होऊन मनस्वीची प्रकृती अधिक खालावली. रात्री उपचारादरम्यान तिचा घाटीत मृत्यू झाला.
बुधवारी तेच चित्र कायम
-बुधवारी ‘लोकमत’ने हिरापूर शिवारात घटनास्थळाची पाहणी केली. जालना रोड ते हिरापूरपर्यंत रस्ताच नसल्याचे दिसले.
-खासगी बांधकामांमुळे भर दिवसा सिमेंट मिक्सर, विनाक्रमांकाचे हायवा सुसाट जातात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
-अरुंद रस्ता, प्रचंड धूळ व अवजड वाहनांमुळे सामान्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मंगळवारच्या अपघातानंतरही बुधवारी हे चित्र कायम होते.
बारावीचे पेपर संपले, सीईटीची तयारी
मनस्वी अभ्यासात हुशार होती. बारावीची परीक्षा देऊन ती सीईटीची तयारी करत होती. तिला एक लहान बहीण असून, सतराव्या वर्षातच ती अनेक जबाबदाऱ्या पार पाडत होती. तिच्या अकाली जाण्याने स्थानिकांसह नातेवाइकांना शोक अनावर झाला.
‘महापारेषण’ही आरोपी
नातेवाइकांच्या संतापानंतर चिकलठाणा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी हायवाचालक, महापारेषण व महापारेषणच्या कंत्राटदारावर मनस्वीच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अंमलदार सुधाकर बोचरे यांनी सांगितले. हेड कॉन्स्टेबल सुनील सुरसे अधिक तपास करीत आहेत.