चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 15:20 IST2025-06-08T15:15:45+5:302025-06-08T15:20:47+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आलेल्या एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Rickshaw driver kills DEd candidate over money dispute | चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : जयराम पिंपळे मयत शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आलेल्या जयराम बबन पिंपळे (२८) याला लुटून पोटात चाकू खुपसण्यात आला होता. ४ जूनला पहाटे ४ ला हॉलिक्रॉस शाळेजवळील घटनेनंतर जयरामवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याची मृत्यूसोबतची झुंज शनिवारी थांबली. त्यानंतर छावणी पोलिसांनी हत्येचे कलम वाढवून मुजम्मील रफीक कुरेशी (२२, रा. राहुलनगर) याला अटक केली.

अहिल्यानगर येथील श्रीरामपूरच्या वडाळा महादेव पिंपळे वस्तीचे रहिवासी असलेले जयराम ३ जूनला शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात आले होते. ४ जूनला वाळूज, पंढरपूरमध्ये पात्रता परीक्षेचे केंद्र होते. परीक्षेला उशीर नको, म्हणून जयराम पहाटेच ३:३० वाजता बाबा चौकातून वाळूजकडे निघाले. लोखंडी पुलाजवळ रिक्षा चालकाने त्यांच्याशी नाहक वाद घालत जयराम यांना अचानक हॉलिक्रॉस शाळेजवळील अंधारात नेत हल्ला चढवला.

शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोठ्या आकाराच्या चाकूने छाती व पोटात वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत जयराम यांनी स्वतःला सावरत बाबा चौकापर्यंत पळत पोहोचले. तेथे एका रिक्षाचालकाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

हल्ला लुटमारीतूनच, पोलिसांनी कलम टाळले 

जयराम यांच्या मृत्यूनंतर छावणी पोलिसांनी हल्लेखोर मुजम्मीलला अटक केली आहे. मुजम्मीलवर कल्याण रेल्वे स्थानक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. तो सतत चाकू बाळगून, नशेतच रिक्षा चालवत होता. हल्ल्यानंतर मुजम्मील जयराम यांचा मोबाईल घेऊन गेला. त्यामुळे ही हत्या लुटमारीतूनच झाली. मात्र, छावणी पोलिसांनी पहिल्यांदा गुन्हा दाखल करताना जाणीवपूर्वक लूटमारीचे कलम टाळले.

६ भावंडांत एकटाच शिकला

 जयराम यांचे आई-वडील शेतकरी आहेत. सहा भावंडांमध्ये ते एकटेच पदवीधर होते. त्यांचे पाचही भाऊ शेती करतात. जयराम यांना शिक्षक व्हायचे होते. २०१२ मध्ये त्यांच्या छातीची शस्त्रक्रिया पार पडली होती. मुजम्मीलच्या हल्ल्यात त्यांच्या छातीजवळचीच नस तुटली. त्यात जयराम काही अंतर पळत गेल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली.

पोलिसांनी काय सांगितले?

"रुग्णलायकडून आम्हाला एका जखमी व्यक्तीबाबत माहिती  देण्यात आली होती. जखमी तरुणाचा जबाब घेतला असता रिक्षा चालकासोबत वाद झाल्याचे समोर आले. जयराम हा वाळूज येथे निघाला होता. मास्क घालण्यावरुन हा वाद झाल्याचे सुरुवातील सांगण्यात आले. मात्र तपासानंतर पैशाच्या देवाण घेवाणीवरुन हा वाद झाल्याचे समोर आलं. वाळूजला जाण्याचा रिक्षाच्या भाड्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालक आणि जयराम यांच्यात हाणामारी झाली. त्यातच रिक्षा चालकाने जयरामवर चाकूने हल्ला केला. त्या दरम्यान, जयरामने रिक्षाची चावी काढून तो बाबा पेट्रोल चौकापर्यंत पळत गेला. त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. जयराम हा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अहिल्यानगर येथून छत्रपती संभाजीनगर येथे आला होता," अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Rickshaw driver kills DEd candidate over money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.