सततची वाहतूक कोंडी, अपघातांच्या सत्रामुळे 'आकाशवाणी चौक' पुन्हा बंद; पोलिसांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:39 IST2026-03-05T12:38:28+5:302026-03-05T12:39:25+5:30
अधिकृत प्रगटन लवकरच होईल जाहीर : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची पुष्टी

सततची वाहतूक कोंडी, अपघातांच्या सत्रामुळे 'आकाशवाणी चौक' पुन्हा बंद; पोलिसांचा मोठा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : ऐन महापालिका निवडणुकीदरम्यान पोलिसांनी बॅरिकेट काढून आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुला केला होता. या निर्णयाला राजकीय दबावाची किनार असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी २१ जानेवारीला जाहीर प्रगटनाद्वारे या निर्णयाबाबत आक्षेप, हरकती, सूचनाही मागवल्या. आता मात्र वीस दिवसांत झालेले चार अपघातासह इतर किरकोळ अपघात आणि सतत होणारी वाहतूककोंडीमुळे पोलिसांनी ५४ दिवसांनी पुन्हा निर्णय पूर्ववत करत आकाशवाणी चौक बंद करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीप्रमाणेच आता सकाळी ९ ते रात्री ९ वाहनांना सदर चौक ओलांडण्यास मनाई असेल.
२०१६ मध्ये सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तासांसाठी आकाशवाणी व अमरप्रीत चौक बंद करून वाहतूक सरळ सुरू ठेवण्याचा प्रयोग राबवला होता. यामुळे वाहतुकीची कोंडी सुटून सिडको चौक ते क्रांती चौक विनाअडथळे वाहने जात होती. त्यानंतर दोन्ही चौक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात अनेकदा व्यापारी, रहिवाशांकडून विरोध झाला. न्यायालयाने याबाबत दखल घेतली होती. मात्र, पोलिसांनी वेळोवेळी चौक बंद ठेवण्याचे ठोस कारणे देत तो बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले होते.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी श्रेयवाद
मनपा निवडणुकीदरम्यान आकाशवाणी चौकातील बॅरिकेट काढून अचानक खुला करण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिस आयुक्तांना याबाबत पत्र पाठवले होते. चौक खुला करण्याचे कुठलेही अधिकृत नोटिफिकेशन न काढल्याने निवडणूक आयोगाने याबाबत खुलासा मागवला होता. त्यामुळे या निर्णयाला राजकीय दबावाची किनार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर २१ जानेवारीला पोलिसांनी जाहीर प्रगटन जारी करून निवडणुकीत राजकीय नेते, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी तत्काळ यूटर्न घेता यावा, यासाठी चौक खुला केल्याचे नमूद करत चौकाबाबत आक्षेप, हरकती, सूचना मागवल्या होत्या.
पोलिसांसह नागरिकही वैतागले, अपघातात वाढ
चौक खुला केल्यापासून सातत्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली. त्याशिवाय रोज कार्यालयीन वेळेत वाहतूककोंडी नित्याची झाली होती. यामुळे पोलिसांसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेत चौक पुन्हा बंद करण्यात आला. लवकरच याबाबत अधिकृत प्रगटन जारी होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.