भाजपची 'मास्टर' व्यूहरचना; छ. संभाजीनगर ZP निवडणुकीकडे शिंदे-ठाकरे सेना फिरकलीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:57 IST2026-03-19T16:55:50+5:302026-03-19T16:57:32+5:30
कोणताही गोंधळ नाही, थेट सत्ता काबीज; अविनाश गलांडे आणि जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड

भाजपची 'मास्टर' व्यूहरचना; छ. संभाजीनगर ZP निवडणुकीकडे शिंदे-ठाकरे सेना फिरकलीच नाही
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडणुकीत कोणताही गोंधळ, तणाव किंवा चुरस पाहायला मिळाली नाही. पण, अचूक राजकीय समीकरणाच्या आधारे भाजपने थेट सत्ता काबीज केली. अत्यंत शांततेत ही निवडणूक बिनविरोध झाली. विशेष म्हणजे, प्रतिस्पर्धी शिंदेसेना तसेच उद्धवसेनेचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत.
सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून अविनाश गलांडे व जितेंद्र जैस्वाल यांनी अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडणुकीचे अर्ज नेले. त्यावेळी कार्यालयाबाहेर आ. प्रशांत बंब बसलेले होते. आ. बंब यांना भेटल्यानंतर अविनाश गलांडे व जितेंद्र जैस्वाल हे जिमखान्याकडे रवाना झाले. तेथे भाजपचे २३, नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या १ महिला सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ४, शरद पवार गटाचा १, अपक्ष २ आणि ‘प्रहार’चा १, अशा ३२ सदस्यांसोबत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जि. प. अध्यक्ष - उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची व्यूहरचना आखली.
पावणेदोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे सर्वांत अगोदर पोहचले. त्यांच्या मागोमाग दुसऱ्या वाहनातून भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, राजू शिंदे, त्यानंतर आ. प्रशांत बंब, त्यानंतर आ. अनुराधा चव्हाण, त्यांच्या मागे दुसऱ्या वाहनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतीश चव्हाण, दत्ता भांगे, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्या वाहनांचा ताफा आला. मागे लगेच ३२ सदस्यांची बस होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच पोलिसांनी प्रमुख नेत्यांना आत सोडले. पण, जेव्हा ट्रॅव्हल बसमधून सदस्य उतरले, तेव्हा पोलिसांनी ओळख पटवूनच त्यांना आत सोडले. सर्व ३१ सदस्य सभागृहात गेले आणि १० मिनिटानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीतांजली वरुण पाथ्रीकर धावतच प्रवेशद्वारावर पोहोचल्या. पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्यांना आत सोडले. आ. प्रशांत बंब व आ. सतीश चव्हाण हे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधीच निघून गेले. जिल्हाधिकारी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. परिसराला छावणीचे रुप आले होते. चांदणे चौक ते कोषागार कार्यालयापर्यंतचा रस्ता बॅरिकेट्स टाकून पोलिसांनी बंद केला होता.
वरिष्ठ नेत्यांनी दिला पदभार
निवडणूक आटोपताच अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी, तर जितेंद्र जैस्वाल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यानंतर दोन्ही पदाधिकारी जिल्हा परिषदेत दाखल होताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला.