दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा चक्काजाम; चिकलठाण्यात रात्री काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:43 IST2025-06-17T11:41:04+5:302025-06-17T11:43:44+5:30
तुटलेल्या विद्युत तारांमुळे शेतात काका-पुतण्याचा अंत; चिकलठाणा गावात हृदयद्रावक घटना; महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा चक्काजाम; चिकलठाण्यात रात्री काय घडले?
छत्रपती संभाजीनगर : शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू जनार्दन दहीहंडे (५०) व किरण ऊर्फ बाळू जगन्नाथ दहीहंडे (३०) या काका-पुतण्याचा वीजप्रवाहित तारांना स्पर्श होऊन शेतातच अंत झाला. सोमवारी सायंकाळी ६ वाजता चिकलठाणा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. गेल्या महिन्याभरापासून महावितरणकडे वादळवाऱ्यात लोंबकळणाऱ्या या तारा हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बेजबाबदारपणामुळे महावितरणकडून त्याच तारांमध्ये अचानक वीजप्रवाह सुरू केला गेल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा जीव गेला. या घटनेनंतर संतप्त कुटुंब, ग्रामस्थांनी दोघांच्या मृतदेहांसह तब्बल अडीच तास जालना रोडवर ठिय्या देत चक्का जाम केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
कचरू व किरण दहीहंडे या काका पुतण्यांची चिकलठाणा परिसरातील जुना बीड बायपासजवळ शेती आहे. तुटपुंज्या शेतीवर दोन्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत होता. सोमवारी सायंकाळी पेरणीच्या पूर्वतयारीसाठी दोघे सोबतच शेतात गेले. मात्र, मे महिन्यातील वादळवाऱ्यात तुटलेल्या विजेच्या तारा त्या परिसरात तशाच पडून होत्या. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १५ मे पासून वीजप्रवाह नसलेल्या या तारा आसपासच्या शेतात तशाच पडून होत्या. सोमवारीदेखील त्यात वीजप्रवाह नसावा, असे वाटल्याने कचरू व किरण यांनी त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात वीजप्रवाह उतरलेला होता. तारांना स्पर्श करताच दोघांना जबर झटका बसला. गंभीररीत्या भाजून दोघे शेतातच गतप्राण झाले.
११ केव्हीची वाहिनी, १९ मे पासून पाठपुरावा
दहीहंडे कुटुंबासह आसपासच्या शेतकऱ्यांनी महिन्याभरापासून या लोंबकळलेल्या तारा बाजूला करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विनंती केली होती. अधिकाऱ्यांना व्हिडीओदेखील पाठवण्यात आले. कार्यालयात जाऊन अर्जदेखील दिले. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ११ केव्हीची ही वीजवाहिनी असलेल्या तारांमध्ये तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी महावितरणने बेजबाबदारपणे अचानक वीजपुरवठा सुरू केला. तो सुरू करण्यापूर्वी तुटलेल्या तारांचा, शेतकऱ्यांचा काहीच विचार महावितरणच्या संबंधितांनी केला नाही.
डीपी बंद करण्याची पण जबाबदारी टाळली
माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांनी महावितरणला अपघाताची माहिती देऊन वीजपुरवठा बंद करण्याची मागणी केली. मात्र, दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच महावितरणचा एकही कर्मचारी, अधिकारी मुख्य डीपी बंद करण्यासाठीही आला नाही. अखेर, शेतकऱ्यांनीच धावपळ करत तो बंद करून कचरू व किरण यांना तारांपासून बाजूला केले.
मृतदेहांसह अडीच तास जालना रोडवर ठिय्या
संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या बेजबाबदारपणावर तीव्र रोष व्यक्त केला. काका- पुतण्याचे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. चिकलठाणा पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर जालना रस्त्यावरच रुग्णवाहिका उभी करून ग्रामस्थांनी जालना रोडवरच ठिय्या दिला. जवळपास ५०० ते ६०० ग्रामस्थ जमा झाल्याने जालना रोड दोन्ही बाजूंनी बंद झाला. तणाव वाढल्याने दंगा काबू पथकासह पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह जवळपास ९ पोलिस निरीक्षक, १६ सहायक निरीक्षकांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
मदत, गुन्ह्याचे ११:३० वाजता लेखी आश्वासन
ग्रामस्थ, कुटुंबाने महावितरणच्या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. शिवाय, मृतांच्या कुटुंबाना आर्थिक मदतीची मागणी केली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकारी प्रशांत स्वामी यांना संपर्क साधून तातडीने आवश्यक कारवाईची मागणी केली. स्वामी यांनी तत्काळ अपर तहसीलदार डॉ. परेशी चौधरी यांना महसूलचा प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्यांनी एका पानावर मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी आर्थिक मदत व महावितरणच्या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीतून सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. साधारण १२:४५ वाजता जालना रोडवरील वाहतूक सुरळीत झाली. या सर्व घटनेत महावितरणच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संपर्क साधला नाही.
घरी सहा महिन्यांची मुलगी, गावात आक्रोश अनावर
मूळ चिकलठाण्याचे असलेले दहिहंडे कुटुंबातील कचरू व किरण अत्यंत शांत व संयमी होते. कचरू यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, पत्नी आहे. तर किरणचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. गावात नेहमी सर्वांशी येता जाता प्रेमाने बोलणाऱ्या काका-पुतण्याच्या अशा मृत्यूने संपूर्ण गावाला आक्रोश अनावर झाला होता.