अधुरी एक कहाणी...प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यातच तिने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:58 IST2023-01-30T20:58:01+5:302023-01-30T20:58:34+5:30

प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबियाकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले होते

An incomplete story...She ended her life just three months after her love marriage | अधुरी एक कहाणी...प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यातच तिने संपविले जीवन

अधुरी एक कहाणी...प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यातच तिने संपविले जीवन

- महेमूद शेख
वाळूजमहानगर :
तीन महिन्यापुर्वी प्रेमविवाह करुन सुखी संसाराचे स्वप्न रंगविणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन  संपविले. ही ह्दयद्रावक घटना आज सोमवार (दि.२०) दुपारी २ वाजेच्या सुमारास बजाजनगरात उघडकीस आली आहे. याप्रेम कहाणीचा अंत झाल्याने गाजलेल्या भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी.. अर्ध्यावरती डाव मोडला.. अधुरी एक कहाणी.. या गिताची आठवण बजाजनगरवासियांना झाली.

अंजली बिरेंद्रसिंग गौतम (२१ रा. कानपुर, उत्तरप्रदेश, ह.मु.बजाजनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. गौतम बिरेंद्रसिंग गौतम यांचे ४ वर्षापूर्वीच अपघातात निधन झाले. जन्मदात्याचे छत्र हरपल्यानंतर आई गिता गौतम हिने हार न मानता औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करत अंजलीचे संगोपन केले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अंजलीने दहावीनंतर बजाजनगरातील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करुन आईला हातभार लावत होती. अशातच अंजलीची काही दिवसांपूर्वी रोहित कारभारी आव्हाड (२२, रा.बजाजनगर) या तरुणासोबत मैत्री झाली होती. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. प्रेमाच्या आणा-भाका घेत अंजली व रोहित यांनी लग्न करुन आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, या प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबियाकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने दोघांनी घरातून पळून जात पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे ९ नोव्हेंबर २०२२ रोजी लग्न केले. त्यानंतर काही दिवस पर्यटन करुन रोहित व अंजली वाळूज एमआयडीसीत परतले. घरी परतल्यानंतर या नवीन जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली.

काही दिवसांत वादाची ठिणगी पडली 
प्रेमविवाहानंतर काही दिवसांतच रोहित व अजंली यांच्यात वाद सुरु झाले. पती व सासरकडील मंडळीत कुरबुरी सुरु झाल्यानंतर अंजलीने या प्रकाराची माहिती आईस दिली होती. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून अंजलीने पती व सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अंजली व रोहित यांचे नातेवाईकांसह समुपदेशन केले. मात्र, समुपदेशानंतर अंजली ही सासरी न जाता बजाजनगरात आईकडे गेली होती.

अर्ध्यावरती डाव मोडला..
आईच्या घरी अंजली ही अबोल रहात होती. आज सकाळी आई गिता या कंपनीत कामासाठी गेल्यानानात्र अंजली घरी एकटीच होती. कंपनीत गेल्यानंतर गिता यांनी अजंली हिच्या मोबाईलवर सतत संपर्क करुनही ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी घरात डोकावून पहिले असता अंजलीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. गीता यांनी लागलीच घर गाठले. लेकीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. पती रोहित व सासरच्या मंडळीच्या छळामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दोषीविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी गीता यांनी केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: An incomplete story...She ended her life just three months after her love marriage