छत्रपती संभाजीनगरात मनपाच्या भरधाव कचरा गाडीने चिरडले; २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:32 IST2026-04-01T18:30:53+5:302026-04-01T18:32:07+5:30
ऐन तारुण्यात होतकरू आणि हुशार मुलाचा मृत्यू झाल्याने खनसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

छत्रपती संभाजीनगरात मनपाच्या भरधाव कचरा गाडीने चिरडले; २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: शहरातील बारापुल्ला गेट परिसरात बुधवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओमकार खनसे (वय २०, रा. बजाज नगर) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऐन तारुण्यात होतकरू आणि हुशार मुलाचा मृत्यू झाल्याने खनसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बजाज नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
एसबी महाविद्यालयाचा विद्यार्थी अपघाताचा बळी
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार हा शहरातील प्रसिद्ध एसबी महाविद्यालयात 'बीबीए'चे शिक्षण घेत होता. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कॉलेज संपवून तो बारापुल्ला गेट परिसरातून जात असताना मनपाच्या कचरा गाडीने त्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ओमकारचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर छावणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. खनसे कुटुंब मूळचे पैठण येथील असून सध्या व्यवसायानिमित्त वाळूज येथे स्थायी होते. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ- बहीण असा परिवार आहे.
चालकाला अटक; घाटीत मृतदेहाचे विच्छेदन
छावणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ओमकारचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. अपघातानंतर पोलिसांनी कचरा गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे पथक करत आहेत.
कचरा गाड्यांच्या वेगावर नागरिकांचा संताप
शहरात कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या वाढत्या वेगावर आणि चालकांच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "रहिवाशी भागात या गाड्या वेगाने चालवल्या जातात, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही," असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कचरा गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.