वृक्ष लागवड न करताच रोपांच्या पिशव्या जंगलात फेकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:38+5:30
वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार राजुरा वनिकरण विभागात घडला आहे. वृक्ष लागवडीबाबत अधिकाऱ्यांचीच अनास्था दिसून आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : वृक्ष लागवड अभियान अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याऐवजी पिशवीतील रोपे जंगलात फेकून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. हा प्रकार राजुरा तालुक्यातील विहीरगाव मार्गावर आढळून आला. त्यामुळे सामाजिक वनिकरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार राजुरा वनिकरण विभागात घडला आहे. वृक्ष लागवडीबाबत अधिकाऱ्यांचीच अनास्था दिसून आली आहे. राजुरा क्षेत्रात येणाºया चनाखा ते मूर्तीपर्यंत रस्त्याचा दुतर्फा वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट होते. वृक्ष लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपांची वाहतूक विहिरगावपर्यँत केली गेली. परंतु पिशवीतील रोपे न लावता थेट जंगलात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चनाखा-विहीरगाव रस्त्यावर वृक्ष लागवडीसाठी रोपटी राजुरावरून ट्रॅक्टरने आणली होती. वाहतूक करताना जी रोपटी खराब झाली, ती त्या झाडाखाली मजुरांनी ठेवली होती. ती मेलेली रोपटी होती. आम्ही वृक्षांचे संगोपन करणारे वृक्ष फेकणार नाही. त्यांचे सदा संगोपनच करू.
- के. एन. घुगलोत, वनपाल, राजुरा.