गणेश दर्शनाच्या आनंदात वाहतूक कोंडीचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:41+5:30

चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते.

Traffic congestion in the pleasure of seeing Ganesh | गणेश दर्शनाच्या आनंदात वाहतूक कोंडीचा मनस्ताप

गणेश दर्शनाच्या आनंदात वाहतूक कोंडीचा मनस्ताप

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारपेठेत गर्दी वाढली : केव्हा मिळणार समस्येतून मुक्तता ?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. रस्ते रुंद करा, अशीे ओरड करून चंद्रपूरकर थकले आहेत. मात्र मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. आता सणासुदीचे दिवस आहेत. गणरायाचे व देवी महालक्ष्मीचे आगमन झाले आहे. बाजारपेठेत, रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. नागरिक गणेश दर्शनासाठी सायंकाळी बाहेर निघू लागले आहेत. त्यांच्या या आनंदात वाहतूक कोंडीचा मनस्तापही चंद्रपूरकरांना सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून अधिक असले तरी त्या तुलनेत पार्र्कींग झोन उपलब्ध नाहीत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात मनपा झाली तरी हे मार्ग रुंद होऊ शकले नाही. उलट अतिक्रमणामुळे अरुंदच होत चालले आहे. वास्तविक नगररचनेत हे दोन मार्ग ८० फुटापर्यंत रुंद असल्याची माहिती आहे.
येथील महात्मा गांधी मार्ग, मिलन चौक, जटपुरा गेट चौक, स्टेट बँक परिसर, गोकुल गल्ली, गंजवार्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर, गोल बाजार, बिनबा रोड, गांधी चौक या मुख्य ठिकाणासह शहरात अनेक ठिकाणी वाट्टेल तिथे वाहने पार्क केलेली आढळतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
आता तर सणासुदीचे दिवस सुरू झाले आहे. चंद्रपुरात गणरायाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती स्थापित झाल्या आहे. आज गुरुवारपासून देवी महालक्ष्मीही अनेक घरात विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत लगबग वाढली आहे. सार्वजनिक गणेश मूर्र्तींचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढली आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन रस्ते चोकअप होत आहेत.

जटपुरा गेटची कोंडी केव्हा सुटणार?
येथील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी एखाद्या रेल्वे फाटकापेक्षाही क्लेश देणारी ठरत आहे. दिवसातून २५-३० वेळा या गेटवर वाहने तुंबून असतात. अशावेळी या गेटच्या बाहेर वाहने काढताना १०-१५ मिनिटे लागतात. अकारण वेळ आणि इंधन खर्ची जाते. या गेटवरील वाहतूक कोंडीतून चंद्रपूरकरांची केव्हा सुटका होईल, हे आजपर्यंत कुणीही ठामपणे सांगू शकले नाही.

फुटपाथ तोडले, पुढे काय ?
मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वाहतूक समस्येमुळे त्रस्त आहेत. चंद्रपुरातील महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग हे प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून चंद्रपुरातील निम्म्याहून अधिक वाहनांची आवागमन होत असते. त्यामुळेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही डोकेदुखी चंद्रपुरातील प्रत्येक व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी अनुभवत असला तरी यावर उपाययोजना नाही. वास्तविक टाऊन प्लॅननुसार हे रस्ते केव्हाच रुंद व्हायला हवे होते. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाला मनपाला कुठली अडचण येत आहे, हेच कळायला मार्ग नाही. आता रस्ता रुंदीकरणासाठी महात्मा गांधी मार्गावरील जयंत टॉकीज परिसरातील फुटपाथ महानगरपालिकेने काढले आहे. मात्र एवढ्याने वाहतुकीची कोंडी सुटणारी नाही.
 

Web Title: Traffic congestion in the pleasure of seeing Ganesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.