रास्त भाव दुकानांच्या वेळेत बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:01:20+5:30
दुकानदार दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने नाराजी उमटत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली. काही राशन दुकानात केवळ दुपारनंतर धान्याचे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांची गर्दी उसळत असल्याचा आरोपही होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानदार व रास्तभाव दुकानातून धान्य घेतेवेळी ग्राहकांमध्ये एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले. परंतू रास्त धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. काही दुकानदार दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने नाराजी उमटत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली. काही राशन दुकानात केवळ दुपारनंतर धान्याचे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांची गर्दी उसळत असल्याचा आरोपही होत आहे.
कोरोना संकटामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन व्यक्तींमध्ये एक मिटरचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी सोशल डिस्टन्ससाठी चौकोन आखावे आणि दुकानासमोर गर्दी होऊ देऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परंतू शहरातील सपना टाकीज मागील परिसरातील दुकानात नियमांचे उल्लंघन झाले. लाकडाऊनमुळे रेशनदुकानातील धान्य वाटप करावे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशन धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धान्य देताना गर्दी होऊ नये, यासाठी दुकानात आवश्यक खबरदारी पाळल्या जात नाही. अपवाद वगळता जिल्ह्यातील अनेक रास्त धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टंस्टिंगचे उल्लंघन होत आहे. शहरातील रेल्वेस्टेशन मार्गावरील रास्त धान्य दुकानदार केवळ सायंकाळी ४ ते ६ असे दोन तासच सुरू ठेवत असल्याची ओरड आहे. या वार्डातील यापूर्वीच्या दुकानदाराचा परवाना रद्द झाल्याने तेथील ग्राहकही या दुकानाला जोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांना धान्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. सध्या नागरिकांच्या हाताला काम नसल्याने खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. अशा वेळी रास्त दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्य वाटपासाठी सकाळपासून दुकान सुरू ठेवल्यास होणारी गर्दी टाळता येणे शक्य आहे.