लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड शहरामधून जड वाहतूक सर्रास सुरू आहे. नागभीड नगर परिषदेने जड वाहतूक बंद करण्याचा ठराव पारित करून घेतला होता. पण या ठरावाची अंमलबजावणी शून्य आहे. नागभीडमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर या जड वाहतुकीचा रविवारी अनेकांना प्रत्यय आला. यावेळी काहिशी वाहतूकही खोळंबली होती.नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. याशिवाय या ठिकाणी तीन महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, तीन माध्यमिक विद्यालये, तीन प्राथमिक शाळा, तीन - चार कॉन्व्हेंट आहेत. या शैक्षणिक प्रतिष्ठानांचे हजारोच्या घरात असलेले विद्यार्थी व विद्यार्थिर्नी शहरातील रस्त्यांनीच अवागमन करीत असतात. या अवागमनाला सामावून घेण्याची पात्रता येथील रस्ते हरवून बसले आहेत.यात आणखी भर म्हणजे येथील अनेक दुकानदारांनी दुकानांसमोरच रस्त्याच्या कडेला शेडची उभारणी करून त्यातच दुकाने थाटल्याने हे रस्ते चांगलेच संकुचित झाले आहेत. यावर कळस असा कीयेथील मोठे व्यापारी बिनदिक्कत मोठया वाहनांनी मालाची ने - आण करीत असतात. यावेळी माल उतरविण्यास दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागत असल्याने नागभीडच्या रस्त्यांनी रोज होणारी वाहतूक चांगलीच प्रभावित होत असते. याशिवाय दोन वाहने एकमेकांसमोर आली की १० ते १५ मिनिटे ताटकळत राहावे लागते. शहरातून होणारी ही जड वाहतूक बंद करावी, अशी ग्रामपंचायतीच्या काळापासून मागणी होत होती. मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आल्याने या समस्येने गंभीर रूप घेतले आहे.दरम्यान, तीन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या नागभीड नगर परिषदेने शहरातून होत असलेली जड वाहतूक बंद करण्याचा ठराव पारित केल्याने नागभीडकरांमध्ये समाधान व्यक्त होत होते. मात्र या ठरावाची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. आजही जड वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नागभीडमधून जड वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM