जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:17+5:30
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत क फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारच्या जनता कफ्युनंतर सोमवारी घराबाहेर पडलेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली. दरम्यान, नागरिकांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत क फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारच्या जनता कफ्युनंतर सोमवारी घराबाहेर पडलेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली. दरम्यान, नागरिकांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.
जनता कर्फ्युला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार वैद्यकीय सुविधा, किराणा, भाजीपाला आदी अत्यावश्यक गरजा पुरविणारी आस्थापने सुरू राहणार आहेत. मात्र, सततच्या दोन दिवसाच्या बंद नंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता पासूनच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी घाई केली. त्यामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळावरील मेडिकल शॉप, किराणा, धान्य दुकान व भाजीपाला मार्केटमध्ये मोठी झुंबड उडाली. परिणामी, बहुतांश ठिकाणी ५ पेक्षा अधिक किती नागरिक एकत्र आल्याचे दिसून आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्याने ग्राहकांचा ओघ कायम होता. दरम्यान, सहा वाजता गोल बाजारात पोलिसांचे पथक आल्याने दुकाने बंद करण्यात आली.
मॉस्क लावूनच दुकानात यावे
३१ मार्चपर्यंत संचारबंदी असल्याने नागरिकांनी पुरेसा धान्यसाठा व जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यातून संपर्क वाढत असल्याने विविध आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मॉस्क किंवा रूमाल बांधूनच दुकानात यावे, असे आवाहन धान्य व भाजीपाला व्यापारी असोसिएशनने केले आहे.
चौकात पोलिसांची गस्त
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व आस्थापने बंद आहेत. परंतु चंद्रपूर शहरातील काही चौकात छुप्या पद्धतीने सुरू असलेला गुटखा, पान विक्री सुरू असल्याचे दिसताच पोलिसांची कुमक वाढविण्यात आली. नियम तोडून गांधी चौकात येणाºया काही महाभागांना पोलिसांनी पिटाळून लावले.
भाजीपाला तेजीत
चंद्रपूर गंज वार्डातील भाजी बाजारात मागील सप्ताहात अल्पदरात विकणारा भाजीपाला सतत दोन दिवसांच्या बंद नंतर तेजीत आला आहे. यात काही वस्तूंचे भाव स्थिर असले तरी हिरवी मिरची, भेंडी, दोडके, शेवगा, कोथिंबीर आदीसह विविध प्रकारची फळे मंगळवारी नेहमीच्या दरापेक्षा महाग विकल्या जात होत्या. गोल बाजारातील धान्य दुकानातही सकाळी ११ वाजतापासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली.