४२ गावांमध्ये सुरू आहे बालहक्क रक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:37+5:30
दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखेच्या वतीने बालहक्क रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातील ८५० गावांमध्ये व जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणारी मोहीम नागरिकांना बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्त्व याबद्दल माहिती देणार आहे. मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरू झाला असून २८ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे.
दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल. असे विवाह रोखण्यासाठी कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. बालविवाह कसे घातक असतात. असा विवाह होत असेल तर त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल.
ग्रामसभांचा आधार
या मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू झाला होता. या टप्प्यात ग्रामीण व आदिवासी भागातील गावकऱ्यांना समस्यांची माहिती देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ग्रामसभांचाही आधार घेतल्या जात आहे. बालहक्काचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचा ठरावही संमत करण्यात आला. दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सुरू करण्यात आला. यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेण्यात आल्या. बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली. युनिसेफचे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होऊन गावकऱ्यांना मोहिमेचे महत्त्व पटवून देत आहेत.