तथागत मेश्राम लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अचानक थांबलेल्या रेल्वेचे चाक हळूहळू रूळावर येवू लागले आहे. संकटामुळे थबकलेले पाऊल आता रेल्वेस्थानकाकडे वळायला लागले आहे. सध्या भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून दिवसभरात १६ गाड्या धावत आहे. प्रवासी संख्या निम्यावर असतानाही रेल्वेमध्ये गर्दी दिसून येत आहे. परंतु रेल्वेस्थानकावर रेल्वे गेली की शुकशुकाट दिसून येतो.भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानक जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. मुंबई हावडा मार्गाला जोडणारा सरळ सेतू आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षण फुल्ल असून नवीन वर्षापर्यंत आरक्षण मिळणार नसल्याची माहिती आहे. गोंदिया-मुंबई मार्गावर धावणाऱ्या प्रवासी गाड्यांचे आरक्षण १५ डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात मिळणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण जवळ जवळ फुल्ल आहे. विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसचे जवळच्या अंतराची तिकीटे उपलब्ध आहे. दूरच्या प्रवाशाचे आरक्षण मात्र डिसेंबरपर्यंत फुल्ल आहे. साधारण प्रवाशांना देण्यात येणारे साधारण तिकीट व मासिक सवलत पास बंद असल्याने प्रवाशांची रेलचेल कमी आहे. पूर्वी तिकीट काऊंटर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरू असायचे. सध्या सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत सुरू असते.
या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्लभंडारा रोड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या हावडा मेल, समता एक्सप्रेसचे, पुरी एक्सप्रेसचे जून महिन्यापर्यंत आरक्षण फुल्ल आहे. तर विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेसचे डिसेंबर आरक्षण फुल्ल झाले आहे. भंडारा रोड येथून जाणाऱ्या जवळपास सर्वच एक्सप्रेसचे डिसेंबरपर्यंत आरक्षण उपलब्ध नाही.
जिल्ह्यात रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढभंडारा राेड रेल्वे स्थानकावरून लॉकडाऊनपुर्वी २६ प्रवासी गाड्या धावत होत्या. काही महिने त्या गाड्या बंद होत्या. सुरूवातीला दोन रेल्वे गाड्या सुरू होत्या. आता गाड्यांची संख्या वाढल्याने सध्या १६ रेल्वे प्रवासी गाड्या या मार्गावरून धावत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन रेल्वेकडून करण्यात येत आहे.