भंडारा येथे कृषी दिनी केला शेतकऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:26+5:30
भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी यांनी शेतकऱ्यांना बाजारातील बदलानुसार पिके घेऊन शेतकऱ्यांच्या संघटनांची असलेली आवश्यकता व शेतीतील बदलांविषयी मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव सांगितले. यावेळी सेंद्रीय शेती करणारे तानाजी गायधने यांनी आपल्या परिसरातील सेंद्रीय शेतीचे अनुभव कथन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा परिषद भंडारा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी.जे. पाडवी, भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.निलेश वजीरे, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेषराव निखाडे, उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी यादवराव कापगते, वसंतराव नाईक शेतनिष्ठ पुरस्कार प्राप्त चंदूलाल राऊत, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त देवानंद चौधरी, प्रगतशिल शेतकरी संजय एकापुरे, चिखलीचे शेतकरी तानाजी गायधने यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी.जे. पाडवी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांना पीक पद्धती बदलाविषयी मार्गदर्शन केले.
भंडारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चौधरी यांनी शेतकऱ्यांना बाजारातील बदलानुसार पिके घेऊन शेतकऱ्यांच्या संघटनांची असलेली आवश्यकता व शेतीतील बदलांविषयी मार्गदर्शन केले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील अनुभव सांगितले.
यावेळी सेंद्रीय शेती करणारे तानाजी गायधने यांनी आपल्या परिसरातील सेंद्रीय शेतीचे अनुभव कथन केले. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कारप्राप्त चंदूलाल राऊत यांनी मिळालेल्या पुरस्काराबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. कृषी दिनानिमीत्ताने निवडक शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये देवानंद चौधरी, चंदूलाल राऊत यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी विकास चौधरी यांनी केले. प्रास्ताविक पी.जे. पाडवी यांनी केले तर आभार पाडवी यांनी मानले.