सरकारच्या बेजबाबदार धोरणाने देश संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:46+5:30
भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील तालुक्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अर्थव्यवस्था दिवसेदिवस खालावत आहे. रोजगार निर्मिती ठप्प झाली असून महागाई गगणाला भिडली आहे. भाजप सरकारच्या अशा बेजाबदार कारभारामुळेच देश संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या अपयशी व नाकर्तेपणाच्या विरोधात काँग्रेस ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडघे पाटील यांनी दिली.
येथील विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव मुजीब पठाण, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष सीमा भुरे, प्रभू मोहतुरे, महेंद्र निंबार्ते, राजकपूर राऊत, शंकर तेलमासरे, माणिकराव ब्राम्हणकर, विकास राऊत, होमराज कापगते, डॉ. विनोद भोयर, प्रेम वनवे, मनोहर उरकुडकर, जयश्री बोरकर, रणवीर भगत, धनराज साठवणे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील तालुक्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यात ६ नोव्हेंबरला साकोली, ७ नोव्हेंबरला पवनी, लाखनी व मोहाडी तर ८ नोव्हेंबरला लाखांदूर, तुमसर आणि ९ नोव्हेंबरला भंडारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगगितले. जिल्हा केंद्रात आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान सेलचे अध्यक्ष आमदार नाना पटोले करणार आहेत. तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनात या मागण्यांचा समावेश
जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावे, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, वाढती महागाईवर अंकुश घालणे, उद्ध्वस्त झालेली बँकींग व्यवस्थेला हातभार लावणे, शेती व जिल्हा तसेच तालुका पातळीवरील समस्यांचे निराकरण करणे आदी मागण्यांचा या ठिय्या आंदोलनात समावेश असणार आहे. या आंदोलनात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेसचे प्रदेश, जिल्हा व कार्यकारिणीचे सदस्य या शिवाय महिला काँग्रेस पदाधिकारी, सेवादल, युवक काँग्रेस व अन्य सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.