बोचऱ्या थंडीत पर्यटकांची पावले ‘गोसी खुर्द’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 05:00 AM2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:52+5:30

पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसी खुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३  वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होत आहे.

In the bitter cold, tourists walk towards Gosi Khurd | बोचऱ्या थंडीत पर्यटकांची पावले ‘गोसी खुर्द’कडे

बोचऱ्या थंडीत पर्यटकांची पावले ‘गोसी खुर्द’कडे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील ऐतिहासिक, निसर्गरम्य, मनमोहक पर्यटन स्थळाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. हिवाळा सुरू झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसी खुर्द धरण, रुयाड सिंदपुरी येथील पत्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीय स्तराची महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किंवा विदर्भातील अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, उमरेड-कऱ्हांडलाचे पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटन स्थळाचा समावेश आहे.
पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसी खुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३  वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होत आहे. पवनीनजिक रुयाड सिंदपुरी येथील पत्रा मेत्ता संघद्वारा निर्मित महासमाधीभुमी महास्तूप भारताच्या स्थापत्त्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपमधील सम्यक सम्बुध्दाची ४० फूट उंच मूर्ती शांत सभागृहात मनाला शांती देते. पवनी हे ऐतिहासिक व  प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्याची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी वैभवशाली शहर म्हणून प्रसिद्ध होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गोंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपूरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. शहराच्या तीन बाजूला टेकड्यावर तीन मैल किल्ला बांधला. नंतर १७० व्या शतकात भोसल्यांचे राज्य आले. परकोटसदृश किल्ल्यामधून बंदुका, तोफामधून गोळ्या मारण्याचे छिद्र आहेत. हा किल्ला आपली ऐतिहासिकतेची साक्ष देत आजही उभा आहे. 
शहरात अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची मूर्ती ही दहाव्या शतकातील असल्याचे मानले जाते. एका शिळास्तंभावर चारही बाजूने गणेशांच्या मूर्ती कोरल्या आहेत. पाचवी मूर्ती नैऋत्य दिशेला कोरली आहे. नवनिर्मित उमरेड-करांडलाच्या पवनी वन्यजीव अभयारण्यामधील जंगल हे घनदाट, विस्तीर्ण असल्यामुळे येथे अनेक वन्य प्राणी व पक्षी मुक्तपणे फिरत असतात. त्यामुळे अभयारण्यात पर्यटकांची गर्दी होत आहे.

 

Web Title: In the bitter cold, tourists walk towards Gosi Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.