प्रत्येक कुटुंबाच्या तपासणीसाठी ५५६ पथक सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:00 AM2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:21+5:30
अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्तीची ओळख पटवून त्यांना उपचार व प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी रुग्णांचे सर्वेक्षण तपासणी व उपचार केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु केली असून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून या मोहिमेसाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८७ हजार दोन घरातील व्यक्तींच्या तपासणीसाठी ५५६ पथक तयार करण्यात आले आहेत. तीन कर्मचारी असलेले पथक दोन फेरीत ही मोहीम राबविणार आहेत.
भंडारा जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अलिकडे मृत्यूही वाढत आहेत. शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेने या मोहिमेचे नियोजन केले आहे. मोहिमेदरम्यान पथकाद्वारे गृहभेटीत संशयीत कोरोना रुग्णांची तपासणी, अती जोखमीच्या व्यक्तीची ओळख पटवून त्यांना उपचार व प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी रुग्णांचे सर्वेक्षण तपासणी व उपचार केले जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात ही मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिली फेरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि दुसरी फेरी १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविली जाणार आहे. मोहीम जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळात राबविण्यात येईल. जिल्ह्यातील शहरे, गावे, वाडी, वस्ती, तांडे येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
या तपासणीसाठी जिल्ह्यात ५५६ पथक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी, दोन स्वयंसेवक त्यात एक पुरुष आणि एक स्त्री असे एकुण तीन कर्मचारी राहणार आहेत. सर्वेक्षणाचे काम अॅपद्वारे केले जाणार असल्याने टीम सदस्यांना सर्वेक्षणपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाच ते दहा टीमच्या मागे स्थानिक स्तरावर पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय मोहीमेची जिल्हा स्तरावरून सनियंत्रण व पर्यवेक्षणाकरिता जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आल आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी माधुरी माथुरकर आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा यासाठी प्रयत्न करीत आहेत. या मोहीमेंतर्गत आढळलेल्या रुग्णांवर योग्य उपचार केले जाणार असून त्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात १२ लाख ५१ हजार लोकसंख्या
जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ९ लाख ६८ हजार ९१३ आणि शहरी लोकसंख्या २ लाख ८२ हजार ९५ एवढी आहे. जिल्ह्याची एकुण लोकसंख्या १२ लाख ५१ हजार ८ आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी मिळून २ लाख ८७ हजार २ घरे आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची आरोग्य तपासणी करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच मोहीम असून कोरोनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांची तपासणी होणार आहे.