जनधन योजनेतील महिलांच्या खात्यांवर ५०० रुपये जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:05+5:30
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहेत. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये महत्वाचे ठरणार आहेत. महिलांच्या खात्यात आगामी तीन महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून असे प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम २ एप्रिल रोजीच बँकेकडे वर्ग करण्यात आली असून बँक आणि ग्राहक सेवा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहेत. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये महत्वाचे ठरणार आहेत. महिलांच्या खात्यात आगामी तीन महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून असे प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. बँकांसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले असून ३ एप्रिल रोजी ज्यांचा खाते क्रमांकाचा शेवट शून्य किंवा एक ने होतो त्या खात्यातील रक्कम काढता येईल तर ४ एप्रिल रोजी खात्याचा शेवटचा अंक दोन किंवा तीन होता त्यांना रक्कम काढता आली. ५ आणि ६ एप्रिलला सुटी असल्याने व्यवहार बंद राहणार असून ७ एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक चार किंवा पाच असेल, ८ एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक सहा किंवा सात असेल आणि ९ एप्रिल रोजी खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ८ किंवा नऊ असेल त्यांना रक्कम काढता येईल अशी माहिती अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली आहे. संबंधितांनी नेमून दिलेल्या दिवशी आणि वेळापत्रकानुसार बँकेत जावे, तेथे गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन असल्याने अनेक गोरगरीबांच्या चुली पेटणे कठीण झाले आहे. बाहेर कुठेही रोजगार नसल्याने पैसा आणायचा कुठूण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या जनधन खात्यात दरमाह तीन महिन्यापर्यंत ५०० रूपये येणार असल्याने गोरगरीबांना खास करून महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.