भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी तब्बल १,५६८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, ९४७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला, तर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत असल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक अलीकडे वाढायला लागला. मात्र, गत तीन दिवसांपासून प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गुरुवारी १,५६८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात २९ हजार ३६५ व्यक्ती कोरोनातून ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १२ हजार २८७, मोहाडी २,५४८, तुमसर ३,८६२, पवनी ३,४९१, लाखनी ३,१२२, साकोली २,६८५ आणि लाखांदूर तालुक्यात १,३७० व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.
गुरुवारी ९४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यात भंडारा ४५९, मोहाडी ३२, तुमसर १३८, पवनी ४०, लाखनी ८७, साकोली १५० आणि लाखांदूर तालुक्यातील ४१ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४१ हजार ४६१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी २९ हजार ३६५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात ११ हजार ४५४ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बाॅक्स
कोरोना बळींची संख्या पोहोचली ६४२ वर
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ४४२ जणांचा बळी घेतला. त्यात भंडारा तालुक्यात ३११, मोहाडी ५५, तुमसर ८४, पवनी ७१, लाखनी ४४, साकोली ५०, लाखांदूर २७ व्यक्तींचा समावेश आहे. गुरुवारी १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यातील ८, मोहाडी आणि साकोली तालुक्यातील प्रत्येकी २, तर तुमसर आणि पवनी तालुक्यांतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.