शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

‘गण गण गणात बोते’चा सिद्धमंत्र देणारे; ब्रह्मज्ञानी, शेगावीचे संत गजानन महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 07:07 IST

Gajanan Maharaj Punyatithi 2024: ऋषिपंचमीला गजानन महाराज यांनी अवतार समाप्ती केली. गण गण गण गणात बोते मंत्रांचा जप करत महाराजांचे स्मरण करुया...

Gajanan Maharaj Punyatithi 2024: महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची ०८ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यतिथी आहे. विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गजानन महाराजांचे लाखो भक्त आहेत. या दिवशी महाराजांचे आवडते पदार्थ चून (पिठले), भाकरी, अंबाडीची भाजी, झुणका, कांदा, हिरव्या मिरच्या असा नैवेद्य भक्तजन मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात. गजानन महाराजांचे स्मरण करून त्यांच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात धावता आढावा...

"अन्नं ब्रहोति" या उपनिषदातील उक्तीचा बोध करण्याकरीताच जणू महाराजांनी लीला केली. "गण गण गणात बोते" हे भजन महाराज निरंतर करीत असत. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांतच खऱ्या अर्थाने महाराजांच्या या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. "जो स्वयंमेव ब्रहा झाला। नांवरुप कोठून त्याला? । नामरुपांचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ।।. अशा या साक्षात परब्रम्ह स्वरूप गजानन महाराजांचा प्रभाव हा मानवाप्रमाणेच पशू, पक्षी आणि पंचमहाभूतांवर सुद्धा होता. 

भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरणारे परमहंस संन्यासी गजानन महाराज

माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. 'गण गण गणात बोते', हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना 'गिणगिणेबुवा', 'गजानन महाराज' अशी नावे पडली.

स्वामी समर्थांचे गजानन महाराजांना मार्गदर्शन

अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. 

गजानन महाराजांचे ३२ वर्षे शेगावांत वास्तव्य अन् हजारोंचा उद्धार

आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या लहानमोठ्या गावातही जात. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. महाराज हे अद्वैतसिध्दांतवादी होते. त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिली नाही. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. अवतारकार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. 

महान योगी, भक्तवत्सल गजानन महाराज अन् लोकमान्य टिळकांची भेट

गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. मात्र, दांभिकतेची त्यांना चीड येत असे. विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचे प्रकार सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्याला काठीने चांगलेच बदडून काढले. लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. गजानन महाराज  कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. 

गण गण गणात बोते सिद्धमंत्रांचा नेमका अर्थ काय?

‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे, असे सांगितले जाते. या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. 

ऋषिपंचमीला अवतार समाप्ती

गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. गजानन महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे.

॥ श्री गजानन, जय गजानन ॥

॥ गण गण गणात बोते॥
 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरShegaonशेगावganpatiगणपती 2024Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास