>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
एखाद्याचा विवाह होण्यास विलंब होत असेल तर 'विवाहाचा योग कधी येतोय काय माहीत!' हे विधान आपण ऐकले असेल, आज ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून हा विवाह योग समजून घेऊ!
विवाह हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे, पण कित्येकांच्या आयुष्यात हा योगच येत नाही. त्यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मागच्या लेखात आपण महादशा ही विवाहयोगाला कशी कारणीभूत असते ते पाहिले, आता विवाह योग पत्रिकेत आहे की नाही ते कसे जाणून घ्यायचे त्याची माहिती पाहू.
Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!
त्यासाठी थोडी कुंडलीची माहिती जाणून घ्या. सप्तमेश पापग्रह युक्त किंवा दृष्ट असेल, म्हणजेच ६, ८, १२ मध्ये असेल, नीच वक्री अस्तंगत असेल किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल वर वैवाहिक सौख्य मिळत नाही. सप्तमेश व्ययात असून लग्नेश किंवा राशीस्वामी सप्तमात पापग्रह दुष्ट असेल तर वैवाहिक सौख्य मिळत नाही. कारण ६, ८, १२ चे स्वामी सप्तमात असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर विवाह होत नाही. सप्तम भाव पापकर्तरी योगात असून शुक्र सुद्धा बिघडला असेल, म्हणजेच कन्या, सिंह राशीत असेल तरी विवाह होत नाही. लग्न कुंडलीत शुक्र सिंह राशीत आणि सिंह नवमांशात असेल तर विवाह कठीण आणि झालाच तर टिकत नाही.
सप्तम भावातील वक्री हर्शल, वक्री प्लुटो विवाह सुखात न्यूनता आणतो. शुक्र केतू युती विरक्ती देते. वैवाहिक सौख्याची ओढ नसते. व्यय भावात पापग्रह असतील तरीही शैयासुख कमी मिळते. बुध शनीसारखे नपुंसक ग्रह सुद्धा विवाह विलंब करतात, मेष लग्नाला सप्तम भावात बुध असेल तर विवाहात अडचणी येतात. सप्तम भावात शनी केतू, शनी बुध असतील तर विवाहात अडचणी येतात, अनेकांचे होतही नाही. सप्तमेश स्वतःपासून ६,८,१२ ह्या भावात असेल किंवा त्रिक भावात असेल तरी त्रासदायक होतो. तुळेचा रवी सप्तम भावात आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर विवाह जमण्यात अडचणी येऊ शकतात.
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
पत्रिकेत द्वितीयेश, सप्तमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध असेल तसेच ह्याचा ६,८,१२ ह्या भावांशीसुद्धा संबंध असून त्यावर राहू शनीचा प्रभाव असेल तरीही वैवाहिक सुख न्यून मानावे लागते. अशा जातकांचे विवाह होत नाहीत.
लग्न कुंडलीतील सप्तमेश नवमांश कुंडलीत दुषित असेल तर वैवाहिक सौख्य जवळ जवळ शून्य! सप्तम भावातील दोन पेक्षा अधिक पापग्रह असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल, तसेच ह्या स्थितीत शुक्र सुद्धा दुषित असेल तर विवाह होणे कठीण होते .
सप्तमेश त्रिक भावात आणि त्रिक भावातील कुठलाही एक किंवा दोन ग्रह सप्तम भावात आले तरीही विवाह दुरापास्त होतो. शुक्र पापग्रहांच्या युतीत , दृष्टीत , वक्री असेल तरी वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात.
अनेकदा विरक्ती देणारा केतूचा संबंध लग्न भाव किंवा सप्तम भाव ह्याच्याशी निगडीत असेल किंवा चंद्र केतूच्या नक्षत्रात असेल तरीही जातकाला स्वतःलाच विवाह करण्याची इच्छा नसते. सप्तम स्थानाशी जर बाधकेशाचा संबंध आला तर अविवाहित राहण्याचे योग येतात. चर लग्नाला लाभेश हा बाधकेश आहे. स्थिर लग्नाला भाग्येश हा बाधकेश आहे. द्विस्वभावी लग्नाला सप्तमेश हा बाधकेश आहे. शुक्र हा जर चंद्र आणि रवी च्या मध्ये असेल तर पत्रिका अविवाहित राहण्याकडे जाते. हे दोघेही शुक्राचे शत्रू आहेत . अशा या ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपण अनेक ग्रह स्थिती अभ्यासल्या.
लग्न न होण्याची इतर कारणे :
अनेकदा कुटुंबातील जबाबदाऱ्या, लहान भावांच्या शिक्षणाच्या, विवाहाच्या जबाबदाऱ्या, आई वडिलांची जबाबदारी, आर्थिक स्थिती, घराच्या समस्या ह्यामुळे सुद्धा विवाह इतके लांबणीवर पडतात की यातच वय उलटून जाते आणि विवाह होत नाही.
सध्याच्या युगात अनेक सामाजिक स्थित मुळे मुलांना विवाह करावेसे वाटत नाहीत अशीही उदाहरणे आहेत. एकटा जीव सदाशिव अशी स्थिती! अनेक तरुण बोलूनही दाखवतात . समाज आणि जग बदलत आहे पण तरीही मनापासून असे वाटते कि विवाह संस्था टिकली पाहिजे ...ती कमकुवत होणे आपल्या हिताचे निश्चितच नाही!
संपर्क : 8104639230