Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 18:16 IST2019-09-24T18:07:50+5:302019-09-24T18:16:11+5:30
विद्यमान मंत्र्याला विकास साधण्यात आले अपयश

Vidhan sabha 2019 : 'निष्क्रीय मंत्र्यांपेक्षा काम करणार्या माणसाला संधी द्या' ; धनंजय मुंडेंचे भरपावसात संपर्क अभियान
परळी : 5 वर्ष मंत्रीपद असूनही त्या माध्यमातून विकास करण्यात ज्या निष्क्रीय ठरल्या त्या विद्यमान मंत्र्यांऐवजी यावेळी विकास करणार्या माणसाला आशिर्वाद द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील गाव, वाडी, तांडा, वस्ती येथे संपर्क अभियान सुरू केले आहे. मतदार संघातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आपली बाजू मांडत असताना ते विद्यमान मंत्र्यांला विकास साधण्यात कसे अपयश आले हे सांगत आहेत. आज त्यांनी पोहनेर गणातील डिग्रस, पोहनेर, कासारवाडी, जळगव्हाण तांडा, रामनगर तांडा या 5 ठिकाणी मतदारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, ज्येष्ठ नेते बाबासाहेब नायबळ, प्रभाकर पौळ, राजेभाऊ पौळ, माधवराव नायबळ, प्रदिप खोसे, राजेभाऊ निर्मळ, नितीन निर्मळ, माऊली घोडके, नितीन काकडे, सुभाष नाटकर, भारत काकडे, विशाल श्रीरंग, वसंतराव राठोड आदींसह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
पोहनेर दत्तक गावाचा तरी विकास झाला का ?
भाताची परिक्षा शितावरून होत असते, मतदार संघाचा विकास जावु द्या, खासदारांनी दत्तक घेतलेल्या पोहनेर गावाचा तरी विकास झाला का ? असा प्रश्न उपस्थित केला.
भर पावसातही मतदारांच्या भेटी
दौरा सुरू असताना अचानक पाऊस आला, मात्र तुमच्या आगमनामुळे आमच्याकडे पाऊस आला आहे, आम्ही हालणार नाहीत, असे म्हणत गावकरी पावसात थांबले आणि धनंजय मुंडेंनीही पावसातच त्यांच्याशी संवाद साधला.