जांभूळ फळाला वातावरण बदलाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:22+5:302021-07-01T04:23:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागात आरोग्यदायी असणाऱ्या जांभूळ फळाला चांगली मागणी आहे. यंदा या फळाला वातावरण बदलाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : ग्रामीण भागात आरोग्यदायी असणाऱ्या जांभूळ फळाला चांगली मागणी आहे. यंदा या फळाला वातावरण बदलाचा फटका बसल्याने कमी बहर आला आहे. दर मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढले आहेत.
वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस यामुळे कमी प्रमाणात बहर आल्याने बाजारात जांभळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने दरही वाढले आहेत. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. पावसाळ्यात हे फळ खाणे म्हणजे आजारपणाला दूर ठेवणे होय. सध्या अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौक, मंडीबाजार, तर ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवरही जांभळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. राज्य रस्त्यावरासह परिसरातील रस्त्यावर जांभळांची छोटी, छोटी दुकाने प्रवासी वर्गाचे आकर्षण ठरत आहेत.
....
पाच किलोची टोपली ६०० रुपये
दरवर्षी जांभूळ फळ मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येते. यंदा हवामानातील बदल व कोरोनामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद झाल्याने जांभूळ फळाची आवक अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. सध्या फळाचा दर्जा पाहून प्रतिकिलोला १०० ते १३० रुपयांपर्यंत भाव मोजावा लागत आहे.
...
आम्ही दरवर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात जांभूळ फळाचे पीक घेतो; परंतु मागील हंगामापासून वातावरणातील बदलामुळे झाडावर फळधारणा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदाही कमी प्रमाणात फळ हातात पडत आहे. त्यामुळे शेतीसाठी मिळणारे भांडवलही कमी प्रमाणात मिळत आहे. यंदा फळांचा राजा आंब्यालाही चांगली मागणी राहिली. आजही आंब्याचे दर प्रतिकिलो १०० रुपयांच्या आसपास आहेत. कोरोना आणि अवकाळी पावसाचा फटका आंब्यालाही बसला. तसाच तो जांभळालाही बसला आहे. बाजारात जांभळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागणी वाढत असल्याने दरही वाढत आहेत.
-गणेश रुद्राक्ष, शेतकरी
...
शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते, तसेच पावसाळ्यात हे फळ खाणे म्हणजे आजारपणाला दूर ठेवणे होय. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जोपर्यंत जांभूळ उपलब्ध आहे तोपर्यंत नियमित खावे. दररोज किमान १० जांभळे खावीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
-डॉ.अतुल शिंदे, मधुमेहतज्ज्ञ, अंबाजोगाई