ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:58 IST2025-06-19T13:56:06+5:302025-06-19T13:58:23+5:30
पैशांअभावी मुलीने शिक्षण अर्धवट सोडले; मुलाचीही बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ओढाताण

ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं
- सखाराम शिंदे
गेवराई (जि. बीड) : मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुरेश आत्माराम जाधव (४६, रा. खळेगाव, ह.मु. गणेशनगर, गेवराई) यांनी मल्टिस्टेटमध्ये ठेवलेले पैसे न मिळाल्याने कंटाळून स्वत:लाच संपविले.
तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. घरात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असे कुटुंब खळेगाव येथे राहायचे. यातच सुरेश जाधव यांना मणक्याच्या आजाराने ग्रासले, तरीही मुलगी व मुलाला चांगले शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर करण्याचे स्वप्न उराशी बाळगत सुरेश जाधव शेतात काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. सुरेश यांना तीन एकर शेती. त्यापैकी दोन एकर शेती त्यांनी विकल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी जाधव हे पाच-सहा वर्षांपूर्वी गेवराई शहरात राहायला आले होते. मोठी मुलगी साक्षी ही बारावी उत्तीर्ण होऊन लातूर येथे नीटची तयारी करत होती.
येथील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये जाधव यांचे ठेवीचे ९ लाख रुपये अडकले होते. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. फी भरता आली नाही, म्हणून मुलगी लातूर येथून अर्धे शिक्षण सोडून आली होती, तर मुलगा शुभम हा बारावी पास होऊन क्लास करत होता. दोघांनाही डॉक्टर करायचे होते. मात्र, मल्टिस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले नऊ लाख रुपये शिक्षणासाठी मिळावेत, यासाठी दोन वर्षांपासून चकरा मारल्या. परंतु, पैसे मिळाले नाहीत. या त्रासाला कंटाळून सुरेश जाधव यांनी मल्टिस्टेटसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे देणे बंद
छत्रपती मल्टिस्टेटच्या २५ शाखांवर दरमहा होणारा खर्च आणि ठेवीदारांना द्यावे लागणाऱ्या व्याजाचा भार यामुळे ही मल्टिस्टेट आर्थिक अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेवराई शाखेत गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे देणे बंद केल्याने ठेवीदार अडचणीत आले. यातूनच बुधवारी पहाटे एका ठेवीदाराने गळफास घेतल्याची घटना घडली.
जवळपास २०० कोटींच्या ठेवी
छत्रपती मल्टिस्टेटच्या गेवराई, बीड, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहिल्यानगरसह राज्यांत जवळपास २५ शाखा आहेत. या शाखांमध्ये शेकडो ठेवीदारांच्या जवळपास २०० कोटींपेक्षा जास्त ठेवी असल्याचे सांगण्यात येते.
दोन गुन्हे दाखल, एका प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे आदेश
गतवर्षी या मल्टिस्टेटच्या प्रमुखावर पुणे व जालना जिल्ह्यात, असे दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. तर, दोन दिवसांपूर्वीच गेवराई येथील ठेवीदार भागुजी धोंडिबा धुळगुंडे यांनी छत्रपती मल्टिस्टेटमध्ये अडकलेले ११ लाख ४७ हजार रुपये मिळावेत म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. यात छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष ऊर्फ नाना बसंता भंडारीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.