ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचे पालटले रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:07+5:30
वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात आला. यात वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
संजय खासबागे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर वसलेल्या महेंद्री येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाने कात टाकली आहे. १०८ वर्षे जुन्या विश्रामगृहाचे रूपडे पालटल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्या उत्साह द्विगुणित झाला आहे. येथे उद्यानासह अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात आला. यात वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांचा सिंहाचा वाटा आहे.
ब्रिटिशकाळात १९१२ मध्ये विदेशी पाहुण्यांच्या निवासाकरिता सन १९१२ मध्ये या विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली. या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण शीतल राहावे, याकरिता दगडामध्ये भिंतींची निर्मिती करण्यात आली. छत गवताचे होते. दोराने हलविणारा पंखा आणि ते हलविणारा माणूस तेथे असायचा. प्रकाशाकरिता कंदिल होते. महेंद्री टेकडीवर अमरावती-पांढुर्णा राज्य महामार्गाच्या बाजूलाच हे विश्रामगृह साकारण्यात आले. येथे दोन शयनकक्ष, एक माजघर, एक भोजनकक्ष आहे, तर खानसामा आणि चौकीदारांचेसुद्धा निवासस्थान आहे. सन १९८७-८८ मध्ये विद्युत व्यवस्था येथे आली.
इको टुरिझम रखडले, असा झाला बदल
सात-आठ वर्षांआधी तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी इको-टुरिझमचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. खानसामा सेवानिवृत्त झाल्यानंतर विश्रामगृहाची फरफट झाली होती.