‘कोरोना’मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:45+5:302021-05-19T04:12:45+5:30

जिल्हाधिकारी : माहिती सादर करण्याचे टास्क फोर्सला निर्देश अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक मुलांनी आई-वडील गमावले आहेत. अशा मुलांची ...

Raising children who have lost both parents due to ‘corona’ | ‘कोरोना’मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे संगोपन

‘कोरोना’मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे संगोपन

Next

जिल्हाधिकारी : माहिती सादर करण्याचे टास्क फोर्सला निर्देश

अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक मुलांनी आई-वडील गमावले आहेत. अशा मुलांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या यथायोग्य संगोपनासाठी जिल्ह्यात कृती दल गठित करण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची माहिती आरोग्य यंत्रणेने व कृती दलाने तातडीने जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोविड-१९’ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड १९ ’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील मुलांना तसेच ‘कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून कृती दल गठित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकाचा फलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षणगृहातील मुलांसाठी तात्काळ स्वतंत्र वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना पोलीस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी मुले शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार, तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत, याचीही दक्षता पोलिस दलाने घ्यावयाची आहे, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. बाल संगोपन योजनेंतर्गत त्यांचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी जिल्हा बालकल्याण समितीने करावी तसेच कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करावी, अशाही सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी बालगृहांचा आढावा घेतला.

दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसाठी संपर्क यंत्रणा :

ज्या मुलांच्या दोन्ही पालकांना कोविड-१९ आजाराचा संसर्ग झाला आहे, त्यांची किंवा कुठली समस्या उद्भवल्यास तातडीने माहिती चाईल्ड लाईन क्रमांक १०९८ , जिल्हा कृती दल समन्वयक (९०२१३५८८१६), बाल कल्याण समिती, हेल्प लाईन क्रमांकावर द्यावी. अशा अनाथ झालेल्या मुलांची व्यवस्था ही महिला व बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/ बालगृह (देसाई लेआऊट, अमरावती), शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह (विजय काॅलनी, अमरावती) व होलिक्रॉस होम फॉर बेबीज (कॅम्प रोड) येथे करण्यात येईल. संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने मुलांच्या पालकांना किंवा नातेवाइकांना ही माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले आहेत.

Web Title: Raising children who have lost both parents due to ‘corona’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.