शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकवटली महिला शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:01:01+5:30
यंदा विभागात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे नुकसान अधिक आहे. येणारा रब्बी हंगाम व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती बिकट आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदतही अत्यल्प असून, शेतकरी व शेतमजुरांचे जगणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागात परतीच्या पावसामुळे पिकांची दुरवस्था झाली. शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे अमरावतीसह पाचही जिल्ह्यांमध्ये ओला दृष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला आघाडीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमहिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात महिला आंदोलनासाठी एकत्र आल्या होत्या. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदन राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे.
यंदा विभागात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतमालाचे नुकसान अधिक आहे. येणारा रब्बी हंगाम व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती बिकट आहे. अशातच शासनाने जाहीर केलेली मदतही अत्यल्प असून, शेतकरी व शेतमजुरांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी कुटुंबातील महिलांची सर्वाधिक ओढाताण होत आहे. ही सर्व विदारक स्थिती लक्षात घेऊन शासनाने विभागातील पाचही जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, भाजीपाला आदी पिकांना हेक्टरी २० हजार रुपये भरपाई द्यावी, संत्रा फळबागेकरिता एकरी ४० हजार रुपये मदत देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, कृषिकामांना रोहयोत प्राधान्य देऊन शेतमजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, आधारभूत किमतीनुसार शेतमालाची खरेदी त्वरित सुरू करावी, शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू करावी आदी मागण्या निवेदनात मांडल्या. आंदोलनात माजी मंत्री वसुधा देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आशा मिरगे, नागपूर जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, संगीता ठाकरे, क्रांती धोटे, शुभदा नाईक, महानगरप्रमुख सुचिता वनवे, मंदा देशमुख, स्मिता घोगरे, सरला इंगळे, मनाली बोरकर, सुषमा बर्वे, अरुणा गावंडे, संध्या वानखडे, नीलिमा शिरभाते, दुर्गा बिसने यांच्यासह विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ती सहभागी झाल्या.