Navneet Rana: "तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही" नवनीत राणांनी जलील यांना सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:15 IST2026-01-25T11:14:36+5:302026-01-25T11:15:29+5:30
Navneet Rana on Imtiaz Jaleel: एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा होईल या वक्तव्याला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जशास तसे उत्तर दिले.

Navneet Rana: "तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही" नवनीत राणांनी जलील यांना सुनावलं!
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत जलील यांना जशास तसे उत्तर दिले. "तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्या महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत," अशा शब्दांत नवनीत राणा यांनी जलील यांना सुनावले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनीत राणा यांनी जलील यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या की, "आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले याचा अर्थ असा नाही की आम्ही गप्प बसू. गरज पडल्यास आम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी १५ सेकंदही पुरेसे आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आमच्या शरीरात आजही छत्रपतींच्या पुत्रांचे आणि भक्तांचे रक्त वाहते. हा महाराष्ट्र कधीही हिरवा होणार नाही." तसेच, जलील ज्या शहरात राहतात, त्या शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
महिलांचा अपमान सहन करणार नाही
इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर आणि अपशब्दांवर नवनीत राणा यांनी तीव्र आक्षेप घेतला. "जर तुम्ही महिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे थांबवले नाही, तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, "जलील यांनी आपले शिष्टाचार पाळावेत आणि सभ्यपणे राहावे. शिस्तीत राहा आणि तुमचे काम करा. जर तुम्ही या देशात अल्पसंख्याक म्हणून जगत असाल, तर चांगले जगा. धमक्या देऊन महाराष्ट्र झुकणार नाही."