डेल्टापेक्षा भयंकर विषाणूने वाढविली चिंता, जिल्ह्यात ९८ गावे लसवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:01:06+5:30
‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा संक्रमणदर डेल्टापेक्षा जास्त असल्याचे जास्त असल्याने लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात मिशन ‘कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे. ही मोहीम सध्या निरंतर सुरू राहण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असताना नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने सर्वांची चिंता वाढविली आहे. राज्याला अलर्ट मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानद्वारे बैठकी घेतल्या जात आहेत. याशिवाय मंगळवारपासून काही नवे निर्बंध लागू केले आहेत. सध्या लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ गावे लसवंत झालेली आहेत.
‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा संक्रमणदर डेल्टापेक्षा जास्त असल्याचे जास्त असल्याने लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात मिशन ‘कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे. ही मोहीम सध्या निरंतर सुरू राहण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ओमायक्रॉनच्या धास्तीने दोन दिवसांत लसीकरणाची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होताच नागरिकांची कोरोनाप्रति असलेली भीती काही प्रमाणात कमी झाली होती व याचा परिणाम लसीकरणावर झाल्याचे दिसून येते. १९६५ गावांपैकी ९८ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सध्या लसीकरणाचा वाढलेला जोर पाहता, लवकरच बहुतेक गावांमध्ये किमान सर्व पात्र नागरिकांचा पहिला डोस पूर्ण होईल, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.
रात्रीच्या वेळीदेखील लसीकरण
शहरात रोज १५ ते १६ लसीकरण केंद्रे तसेच ३० पेक्षा अधिक शिबिरांद्वारे लसीकरण केले जात आहे. एखादे केंद्रांवर रात्री ११ पर्यंत लसीकरण केल्याची नोंद आहे. रात्रीच्या लसीकरणाला मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्य विभागाचा जोर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेसाठी दिसून येत आहे.
शहरात शतप्रतिशत लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या मोहिमेत सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांचे सहकार्यदेखील मिळत आहे.
- प्रशांत रोडे
आयुक्त महापालिका
विदेशातून कुणी आले तर काय?
- जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या मदतीने परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाणार आहे. शासनाद्वारेही विदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती व नंबर दिला जाणार आहे.
- अद्याप अशाप्रकारे कोणी व्यक्ती परदेशातून आल्याची माहिती अद्याप प्राप्त नसल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनीदेखील परदेशातून कुणी व्यक्ती आल्यास प्रशासनाला माहिती देणे महत्त्वाचे आहे.