चोरी गेलेले १३ मोबाईल दिले परत
उरळ: चोरी गेलेले, हरविलेले मोबाईल उरळ पोलिसांनी तपास करून शोधून काढले आणि शुक्रवारी ठाणेदार अनंत वडतकार यांनी १३ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत दिले. ठाणेदार अनंत वडतकार व पोलीस कर्मचारी विजय चव्हाण, चेतन पाली, शैलेश घुगे, धनपाल लाटकर यांनी चोरी गेलेल्या, हरविलेल्या माेबाईलचा शोध घेतला. एक लाख २५ हजार रूपये किंमतीचे मोबाईल तक्रारदारांच्या स्वाधीन केले.
माेझरी ते कानशिवणी बस सुरू करा
पिंजर : मोझरी बु. पार्डी ते कानशिवणी मार्गावर प्रवाशांची व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ आहे. या मार्गावर तातडीने एस. टी. बससेवा करावी. अशी मागणी सरपंच सुधाकर महल्ले यांनी विभाग नियंत्रकांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे. गत अनेक महिन्यांपासून या मागार्गावरील एस. टी. बस बंद आहे. त्यामुळे बसगाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त
बाळापूर: राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघातसुद्धा घडत आहेत. बाळापूर ते अकोला दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
रोहयोचे अनुदान देण्याची मागणी
खंडाळा: शासनाच्या रोहयो अंतर्गत शेतकर्यांना फळ पीक रोपांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येते. शेतकर्यांनी रोपे आणली. परंतु त्यांना शासनाकडून अद्याप अनुदान देण्यात आले नाही. शासनाने अनुदान द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आगर गावात पाण्याचा अपव्यय
आगर: येथील पाण्याच्या टाकीजवळ व्हॉल्व्ह गळती असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. व्हॉल्व्हची दुरूस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शाळा सुरू झाल्याने पालक समाधानी
मुंडगाव : कोरोनामुळे दहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. शासनाच्या आदेशानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करून अध्यापन सुरू करण्यात आले. मुलेही घरात कंटाळली होती. आता शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यासह पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. नियमांचे पालन करून अध्यापन करण्यात येत आहे.
हरभरा पिकात वन्यप्राण्यांचा धूडगूस
खानापूर: सध्या हरभरा पीक जोम आहेत. काही भागांत हरभरा पीक फुलोऱ्यावर आहे तर काही ठिकाणी हरभरा पिकाचे घाटे भरले आहेत; परंतु हरभरा पिकात वन्यप्राणी धूडगूस घालून पिकाची नासाडी करत आहेत. बोंडअळी, तुरीवरील अळीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच वन्यप्राण्यांमुळेही शेतकरी हतबल झाला आहे.