जिल्हा परिषदेत आघाडी राहिली अभेद्य

By Admin | Updated: September 21, 2014 23:49 IST2014-09-21T23:48:14+5:302014-09-21T23:49:58+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता.

In the zilla parishad, the lead was impregnable | जिल्हा परिषदेत आघाडी राहिली अभेद्य

जिल्हा परिषदेत आघाडी राहिली अभेद्य

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात पदाधिकारी निवडीत ही आघाडी टिकेल की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमुळे आघाडी टिकली. दरम्यान, शनिवार दुपारपासून निवडीबाबत नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या, अफवा पसरल्या आणि आरोपही झाले. मात्र सरतेशेवटी आघाडी अभेद्य राहीली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची रविवारी निवड झाली. तत्पूर्वी दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या आणि सदस्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने बहुमताचा आकडा कधीच झाला होता. मात्र, अध्यक्षपदासाठी कर्जतच्या मंजुषा गुंड यांचे नाव अंतिम झाल्याने राष्ट्रवादीतील एक गट कमालीचा अस्वस्थ झाला. या गटाने नगर तालुक्यातील इच्छुक कालिंदी लामखडे यांचे नाव उचलून धरले. यासाठी राष्ट्रवादीत नाराज असणाऱ्या सदस्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. सोबत युतीच्या १२ सदस्यांशी संपर्क करण्यात आला. तर काँग्रेसमधील थोरात गटाला साद घालण्यात आली. ही वार्ता शनिवारी रात्री काँग्रेसच्या गोटात धडकली. यामुळे काँग्रेसने आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार रविवारी सकाळी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, अण्णासाहेब शेलार आणि बाळासाहेब हराळ यांची नावे चर्चेत होती. मात्र, ऐनवेळी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, राष्ट्रवादीची शनिवारी रात्री बैठक झाली. यावेळी पालकमंत्री मधुकर पिचड, निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग उपस्थित होते. तालुकानिहाय यावेळी सदस्यांची मते जाणून घेतली. यावेळी नाराज असणाऱ्या नगर तालुक्यातील त्या नेत्यांचे कान पालकमंत्री पिचड यांनी उपटले असल्याचे समजते.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता मंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री पिचड, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आ. सुधीर तांबे, आ. चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष अभंग, जयंत ससाणे यांची बैठक झाली. त्यावेळी विषय समित्याच्या निवडीबाबत चर्चा झाली. मंत्री विखे यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना जिल्हा परिषदेत एक रहा आणि मतदानाच्यावेळी ज्यांच्या नावाचा व्हिप निघेल त्याला मतदानाचे आवाहन केले. (प्रतिनिधी)

Web Title: In the zilla parishad, the lead was impregnable