जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण व कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर रविवारी पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची संपूर्ण तयारी झालेली आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लसीकरणही होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील लसीकरणाबाबत पहिल्यापासूनच त्रुटी आहेत. पहिल्या टप्प्यात लस उपलब्ध असताना ती घेतली गेली नसल्याने ती वाया गेली. त्यामुळे अहमदनगर जिल्हा लसीकरणाबाबत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागेच राहिला. सध्या सरासरी २६ टक्के लसीकरण झाले आहे, तर १८ वर्षांवरील नागरिकांचे ८ टक्के लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ७० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असेही मुश्रीफ म्हणाले.
सरकारी रुग्णालयात लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. याबाबत तक्रार आली तर संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल. २६ टक्के लसीकरण झाले असले तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे आहे. व्यवहार सुरळीत करण्यासाठी परवानगी दिली असली तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात पाऊस कमी आहे. येत्या आठवड्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास दुष्काळाची परिस्थिती राहणार नाही. पाऊस पडला नाही तर दुष्काळाचा विषय मंत्रिमंडळासमोर मांडावा लागेल. मुळा व गोदावरी नदीत आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्याचेही मुश्रीफ म्हणाले.