नगर जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:22+5:302021-09-07T04:27:22+5:30
अहमदनगर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नगर जिल्ह्यात ६, ७ आणि ८ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ...

नगर जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
अहमदनगर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नगर जिल्ह्यात ६, ७ आणि ८ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे, नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. तसेच पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून दूर जावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल शक्यतो ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक इमारतीमध्ये आश्रय टाळावा. घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनास जाणे टाळावे. नदीच्या प्रवाहात उतरू नये. मेघगर्जना सुरू असताना झाडांच्या खाली थांबू नये. सर्व प्रकारचे विद्युत खांब, रोहित्रापासून दूर राहण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ टक्के पाऊस झाला आहे.