संगमनेर : केरळमध्ये सण-उत्सव साजरे झाले. त्यानंतर तेथे कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे शासनाने नाइलाजास्तव काही बंधने घातली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवारी (दि. ०७) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, पांडुरंग पवार, सुनील पाटील, उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख, नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, नगरसेवक विश्वास मुर्तडक, शैलेश कलंत्री, किशोर पवार, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, नूरमोहम्मद शेख, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत वामन, एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, शरद थोरात, राजेंद्र देशमुख, राजेश आसोपा, शौकत जहागीरदार, निखिल पापडेजा, कैलास कासार, योगिराज परदेशी, अक्षय थोरात, दीपक साळुंखे, सम्राट हासे, विजय पांढरे आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत आलेल्या सूचनांनुसार शांतता समितीची पुनर्रचना करावी. यात ज्येष्ठ आणि तरुणांचा समावेश असावा. तसेच दर महिन्याला समितीची बैठक बोलवावी, अशी सूचनाही पोलीस अधीक्षक पाटील यांनी केली.
----------
महावितरण विरोधात रोष
सर्वच धर्मीयांच्या सण, उत्सवात वीज पुरवठा नेहमीच खंडित होतो. गणेशोत्सवात देखील असेच होते. त्यामुळे अनेकांनी महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. मात्र, महावितरणचे अधिकारी याविषयी अधिक काहीही बोलले नाहीत.
-----------
नाराजी केली व्यक्त
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी गणेश विसर्जनावेळी नागरिकांच्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन केले. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मात्र, त्यांना शांतता समितीच्या बैठकीसाठी निरोप नसल्याने काहींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.
------------