कोपरगाव : भारतीय खेळाडूंनी पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक १९ पदकांची लयलूट करून ५३ वर्षांनंतर जगात आपले वर्चस्व सिद्ध केले असून, या सर्व खेळाडूंची कामगिरी भारतीय देशाचा गौरव आणि भूषण वाढवणारी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘खेलो इंडिया अभियान’ यशस्वी होत असल्याचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.
कोल्हे म्हणाले, क्रीडाजगताचा नावलौकिक वाढवण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे हे सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन देऊन प्रयत्न करतात, अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रांत नैपुण्य मिळवणारे खेळाडू राज्य, देशपातळीवर बक्षिसे मिळवीत असतात. त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळ देऊन ते पॅरालिम्पिक स्पर्धेत यापुढे कसे यशस्वी होतील, याचे नियोजन सध्या सुरू आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य सोहळ्यात त्यांचे स्थान निश्चितच जागतिक कीर्तीचे आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंची कामगिरी अत्यंत सरस राहिली.