राष्ट्रवादीच प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:36+5:302021-09-18T04:22:36+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणाची उंची वाढविणे, डिंभे-माणिकडोह बोगद्याचे काम आणि घोड धरणातील गाळ काढणे, पश्चिम घाटमाथ्यावरून ...

राष्ट्रवादीच प्रश्न सोडविणार
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरणाची उंची वाढविणे, डिंभे-माणिकडोह बोगद्याचे काम आणि घोड धरणातील गाळ काढणे, पश्चिम घाटमाथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडविणे यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सखोल चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कुकडीचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, अशा विश्वास माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. शरद पवार यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कुकडी, घोडच्या पाणीप्रश्नात योग्य वेळी लक्ष घातले आहे. आता ते सोडविण्याची ठोस भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता पाणीप्रश्नावर श्रेयासाठी राजकारण अथवा प्रसिद्धी, पत्रकबाजी न करता सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच सुटू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब शेलार, संजय आनंदकर उपस्थित होते.
.....
पाणीप्रश्नात व्यर्थ लुडबुड
गेल्या आठवड्यात बाबासाहेब भोस व मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भेटलो होतो. त्यानंतर पवारांनी कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक घेतली. मात्र काहीजण विनानिमंत्रणाचे उपस्थित राहिले. ही व्यर्थ लुडबुड आहे. पवारांची पाणीप्रश्नावर बैठक झाली. बैठकीला उपस्थित असलेल्या कोणत्याच आमदाराने याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही; पण काहीजण नुसतेच श्रेय घेण्यात पुढे असतात, असा टोला बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी लगावला.