आता रोज २५ हजार कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:57+5:302021-09-21T04:23:57+5:30
अहमदनगर : राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण ...

आता रोज २५ हजार कोरोना चाचण्या
अहमदनगर : राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चिंता व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्या दहा हजारांनी वाढवून रोज २५ हजार चाचण्या कराव्यात. लसीकरणाचा वेग वाढवून दिवाळीपर्यंत शंभर टक्के लसीकरण करावे आणि दहापेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या शंभर गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचा आदेश गमे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान कोरोना वाढत असल्याने उपाययोजना थंड पडल्याने जिल्हा रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही गमे यांनी चांगलेच खडसावले.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोरोनाच्या सद्यस्थिती आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह आरोग्य व महसूल यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी कोरोना नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या निर्बंधासोबत एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील ३० व्यक्तींची तपासणी करावी. कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे तेथे नागरिकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध घालणे, दहा टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या परिसरात लॉकडाऊन करणे, आठवडे बाजार बंद ठेवणे, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना सामान देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करणे, होम आयसोलेशन बंद करणे, बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, लसीकरण वाढविणे आदी उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.
---
मुख्यमंत्री स्तरावरूनच मिळाल्या सूचना
संभाव्य तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. राज्यात सगळीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण कमी होत नसल्याने राज्य सरकारनेच चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री स्तरावरून विभागीय आयुक्तांना अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण का कमी होत नाहीत, याबाबत आढावा घेण्याच्या सूचना मिळाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी नगर जिल्ह्यात दोन दिवस तळ ठोकून आढावा घेण्याचा निर्णय घेतला. गमे यांनी दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात तर दुपारनंतर महापालिकेत शहरातील कोरोना रुग्ण व लसीकरणाचा आढावा घेतला. मंगळवारी ते नगर, पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत.
--------------
जिल्ह्यात सिरो सर्व्हे करणार
किती लोकांना कोरोना होऊन गेला आणि त्यांच्यामध्ये ॲंटीबॉडी तयार झाल्या, याबाबतची तपासणी करणारा सिरो सर्व्हे करण्याचे आदेशही यंत्रणेला दिले आहेत, असे गमे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले. चाचण्या आणि लसीकरणाची गती वाढविणे, १० पेक्षा जास्त बाधित होणाऱ्या गावांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. तेथील आठवडे बाजारही बंद करण्यात येईल. पूर्वी ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत होती, ती आता ३०० मेट्रिक टन इतकी होईल, असे गमे म्हणाले.
--
फोटो-
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. समवेत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी.