यंदाही अकरावी प्रवेशाची चिंता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:11+5:302021-07-21T04:16:11+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. ...

No worries about the eleventh entry this year either | यंदाही अकरावी प्रवेशाची चिंता नाही

यंदाही अकरावी प्रवेशाची चिंता नाही

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला. यात ९९.९७ टक्क्यांच्या सरासरीने ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, नगर जिल्ह्यात अकरावीसाठी अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयंसिद्ध अकरावीच्या ९४० तुकड्यांमध्ये ७६ हजार ६०० जागा आहेत. यामुळे यंदा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना चिंता नसून अकरावीत सहज प्रवेश मिळणार आहे. गेल्या वर्षी (२०२०-२१) नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.१० टक्के लागून ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्या वेळीही अकरावीच्या ७६ हजार जागा होत्या.

यंदाही जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ७६ हजार ६०० जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात ४४० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ४५३ अनुदानित, २९५ विनाअनुदानित, १९२ स्वयं अर्थसहायित अशा एकूण ९४० तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ७६ हजार ६०० आहे. त्या तुलनेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७० हजार ५६६ आहे. त्यामुळे सर्वांना सहज प्रवेश मिळणार आहे.

--------------

सीईटीने मिळणार नामांकित महाविद्यालय

यंदा दहावीच्या परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार असून, २१ ॲागस्टला या परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. जे परीक्षा देतील त्या गुणांवर त्यांना नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळेल. जे परीक्षा देणार नाहीत, त्यांना सीईटीचे प्रवेश झाल्यानंतर उर्वरित जागांवर दहावीतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळतील.

---------------

४४ टक्के जागा विज्ञान शाखेसाठी

नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही ४४ टक्के जागा (३४ हजार) विज्ञानसाठी राखीव आहेत. तर कला शाखेसाठी २९ हजार ६०० जागा असून, १० हजार ९७० जागा वाणिज्य शाखेसाठी आहेत.

Web Title: No worries about the eleventh entry this year either