कोपरगाव : अगोदरच नगर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यातच पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. या सर्वच रस्त्यांवरून जातांना बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वच बसेसच्या मेंटेनन्समध्ये वाढ झाल्याने बसच्या फेऱ्या सुरू असताना उत्पन्नापेक्षा खर्चच वाढल्याने याचा थेट फटका एसटी महामंडळाला बसत आहे.
राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून आहे. या जिल्ह्यात जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक संस्था, साखर तसेच इतर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यात एकूण १४ तालुके असून, ११ बस आगार आहेत. या सर्व आगारांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात महामंडळाच्या बसचे जाळे पसरलेले आहे.
कोरोनामुळे सर्वच आगारांच्या तालुकाअंतर्गत वाहतूक बंद आहे, तर तालुका ते इतर तालुका व जिल्हा अशी वाहतूक सुरू आहे. सध्या तारकपूर आगारातून वाहतूक सुरू असताना नगर - कोपरगाव, नगर - नाशिक, सोलापूर - पंढरपूर या रस्त्यांची पूर्णतः खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामध्ये पाट्याच्या स्प्रिंग तुटणे, गिअर बॉक्स व हाऊजिंगचा जॉईंट तुटणे, बाकडे, खिडक्या तुटणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसची बॉडी खिळखिळी होणे, असे प्रकार वाढले आहेत. त्यातच कोरोनामुळे सुरू असलेल्या बसला अपेक्षित प्रवासीदेखील मिळत नाहीत. त्यामुळे उत्पन्न व तोटा यांचा मेळ लावताना आगारप्रमुखांची चांगलीच कसरत होत आहे.
.................
तारकपूर आगार एकूण गाड्या
बस - ७६
ट्रक - ८
.........
तारकपूर आगारातून सुरू असलेल्या बसचे मार्ग व फेऱ्या
नगर - शिर्डी ( धुळे, सुरत ) - ५
नगर - नाशिक - १०
नगर - कल्याण - १५
नगर - पुणे - १५
नगर - सोलापूर- ३
नगर - पंढरपूर - ६
नगर - गांडगापूर - १
.................
सध्या बसेस सुरू असलेले सर्वच रस्ते खूप खराब झाले आहेत. त्यामुळे बसेसच्या स्पेअरपार्टसह विविध नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच प्रवासी संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी उत्पन्नापेक्षा खर्चाच्या बाजू वाढल्या आहेत.
- अभिजित आघाव, आगार व्यवस्थापक, तारकपूर.
---------------
स्टार ११४१