राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या १५ मार्च २०२१ च्या शासन निर्णयानुसार स्वच्छतेमधील शाश्वतता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक घनकचरा व्यवस्थापन, गावाची वैयक्तिक व सार्वजनिक दृष्यमान स्थिती, सार्वजनिक शौचालय स्थिती, गावातील सार्वजनिक ठिकाणाची सुविधा (शौचालय, पाण्याची सुविधा), घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व मैला गाळ व्यवस्थापन या निकषांची पूर्तता करून ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) केल्या जात आहेत.
सन २०१८ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. परंतु घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हिवरे बाजार (ता. नगर) लोणी बु., लोहगाव (ता. राहाता), गणेगाव, दवनगाव (ता. राहुरी) अशा एकूण ५ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस झाल्याचे स्वयंघोषणापत्र केले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) च्या निकषांची उत्स्फूर्तपणे पूर्तता करून शाश्वत स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव यांनी केले आहे.