अहमदनगर : गेल्या काही वर्षांत गंभीर गुन्ह्यात दोष सिद्धतेचे प्रमाण घटले असून पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष सुटून समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत. हे पोलीस आणि सरकारी पक्षाचे अपयश आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा सत्र न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यात दोष सिद्धतेचे अवघे ३५ टक्के प्रमाण असल्याचे आकडेवारी सांगते. इतर गुन्ह्यातील प्रमाण तर यापेक्षाही कमी आहे.
गुन्हा घडल्यानंतर सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे आणि सरकारी वकिलाच्या मदतीने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणे. हे संबंधित गुन्ह्यातील तपासी अधिकाऱ्याचे काम असते. पोलिसांनी दोषारोपपत्रात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील फिर्यादीची बाजू मांडत असतात. मात्र तपासात त्रुटी, अपेक्षित पुरावे सादर न करणे, साक्षीदार फितूर होणे आदी कारणांमुळे खून, खुनाचा प्रयत्न अत्याचार, दरोडा, जबरी चोरी, दुखापत अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटत असल्याचे पहावयास मिळते.
----------------
अपयशाचे खापर साक्षीदारांवर
खुटल्याही खटल्यात साक्षीदार हा महत्त्वाचा दुवा असतो. बहुतांशी खटल्यात साक्षीदार फितूर झाल्याने आरोपी निर्दोष सुटल्याचे जिल्हा न्यायालयातील उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत साक्षीदारांचा विश्वास संपादन करणे, त्यांना कायदेशीर संरक्षण देणे, ते साक्ष बदलणार नाहीत याची दक्षता घेणे ही जबाबदारी पोलिसांचीच असते. मात्र आरोपी निर्दोष सुटल्यानंतर बहुतांशीवेळा साक्षीदारांवर खापर फोडले जाते.
---------------------
राज्यभर गाजलेल्या खून खटल्यातील आरोपी निर्दोष
राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे हत्याप्रकरणातील दहा आरोपींची चार वर्षांपूर्वी पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. तर शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींचीही मार्च २०२१ मध्ये जिल्हा न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली. या दोन्ही खून खटल्यात तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयासमोर सक्षम पुरावे सादर करता आले नाही. ही केवळ दोन उदाहरणे आहेत. अशा स्वरूपाच्या अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटत असल्याचे वास्तव आहे.
------------------------------
वर्षभभरात गुन्हे सिद्धतेची टक्केवारी
खून- ३५
खुनाचा प्रयत्न-२३
विनयभंग-१४
दरोडा-१०
जबरी चोरी-१०
दुखापत-२२