शेतकऱ्यांची हकालपट्टी तर व्यापाऱ्यांना भर चौकात जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:04+5:302021-03-26T04:20:04+5:30

कोतूळ : कोरोना संचारबंदीत कोतूळात एक अजब प्रकार समोर आला आहे. आठवडा बाजारच्या दिवशी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना गावाबाहेर ...

Expulsion of farmers and relocation of traders | शेतकऱ्यांची हकालपट्टी तर व्यापाऱ्यांना भर चौकात जागा

शेतकऱ्यांची हकालपट्टी तर व्यापाऱ्यांना भर चौकात जागा

कोतूळ : कोरोना संचारबंदीत कोतूळात एक अजब प्रकार समोर आला आहे. आठवडा बाजारच्या दिवशी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना गावाबाहेर हाकलले तर व्यापाऱ्यांना भर चौकात जागा दिल्याने ग्रामसेवकांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोतूळात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे आठवडा बाजार बंद होता. दोन महिन्यांपूर्वी हा बाजार सुरू झाला. दरम्यान, वर्षात कोतूळात भाजीपाला विकणारे किमान शेकडाभर नवीन व्यापारी तयार झाले. हे व्यापारी गावातील मोक्याच्या जागेवर चारचाकी गाड्या, हातगाड्या लावतात. दुप्पट नफ्याने भाजीपाला विकतात.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने संचारबंदी व गर्दी नियंत्रण कायदा ग्रामपंचायत प्रशासनाने लागू केला. त्यामुळे आठवडा बाजार बंद केला. शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी गर्दी करू नये, असे ग्रामसेवक व तलाठी व्यापाऱ्यांच्या बैठकीत ठरले. कडक अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, यात कोतूळ बाजारतळावर व्यापाऱ्यांचा दररोज भाजी बाजार सुरू झाला. किमान पन्नास व्यापारी येथे बसू लागले. शेतकरी आला तर त्याला जागाच मिळू दिली जात नाही. बसलाच कुठे तर ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी हाकलून देतात. शेतकरी त्यांचा भाजीपाला या व्यापाऱ्यांना अत्यंत कमी भावात देऊन घरी जातात. कमी भावात घेतलेला माल हे व्यापारी दुप्पट रकमेने विकतात. राजूर, अकोले येथे मात्र बाजारच्या दिवशी शेतकऱ्यांना बाजारात सामाजिक अंतर ठेवून जागा दिल्या जातात.

..............

बुधवारी आठवडा बाजारच्या दिवशी जवळे कडलग येथील एक शेतकरी सोनाका जातीची द्राक्ो पन्नास रुपये किलोने विकत होता. व्यापारी मात्र ऐंशी रुपयाने विकत होते. एक तासात या शेतकऱ्याला गावाबाहेर हाकलले. बोरी, वाघापूर येथील शेतकरी पंधरा रुपये किलोने बटाटा विकत होते. मात्र, शेतकरी हाकलल्याने बटाटा वीस ते पंचवीस रुपये झाला. टाेमॅटो पन्नास रुपये किलो, शेवगा ऐंशी, मिरची ऐंशी ते शंभर रूपये किलो झाली. धामणाव आवारी येथील एका शेतकऱ्याने ही मिरची चाळीस रुपये किलोने जागा नसल्याने विकली होती.

..............

कोतूळात गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना आठवडा बाजारात भाजीपाला घेऊन आले तर बसू दिले जात नाही. मात्र, बाजारतळावर व्यापाऱ्यांचा दररोज बाजार भरतो. बोरी येथील एक शेतकरी ढसढसा रडलेला मी पाहिला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देणार आहोत.

- गौतम रोकडे, शेतकरी, बोरी

फोटो - कोतूळ१,२

Web Title: Expulsion of farmers and relocation of traders