कोरोनाने हिरावला मरणोत्तर दृष्टीदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:51+5:302021-06-10T04:15:51+5:30
अरुण वाघमोडे लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : या जगातून निघून गेल्यानंतरही आपल्या डोळ्यांनी ही सृष्टी कुणीतरी पहावी, या उदात्त ...

कोरोनाने हिरावला मरणोत्तर दृष्टीदानाचा संकल्प
अरुण वाघमोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : या जगातून निघून गेल्यानंतरही आपल्या डोळ्यांनी ही सृष्टी कुणीतरी पहावी, या उदात्त हेतूने अनेकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे. कोरोना महामारीने मात्र अनेकांचा हा संकल्प हिरावून घेतला आहे. येथील फिनिक्स फाउंडेशनकडे नेत्रदानाचा संकल्प केलेल्या ३८ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे दृष्टीदान करून घेता आले नाही, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली. सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यासह सर्वत्र मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ व्यापक झाली आहे. बहुतांशी जणांनी सामाजिक संस्थांसह शासकीय रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान करण्याचे अर्ज भरून दिलेले आहेत. असा संकल्प करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याची दृष्टी घेता येत नाही. त्यामुळे मरणानंतर ही आपल्या दृष्टीने ही सृष्टी कुणीतरी पहावी, असा संकल्प करणाऱ्या अनेकांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली आहे.
-----------------------
फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या २६ वर्षांपासून नेत्रदान चळवळ राबविली जात आहे. फाउंडेशनकडे आतापर्यंत ७८ जणांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे. यातील ६२३ जणांचे गेल्या काही वर्षांत मरणोत्तर यशस्वीरीत्या दृष्टी दान करून घेण्यात आलेले आहे. फाउंडेशनकडे नेत्रदानाचा संकल्प केलेल्या ३८ जणांचा मात्र कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाल्यामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
- जालिंदर बोरुडे, अध्यक्ष फिनिक्स फाउंडेशन
------------------------
म्युकरमायकोसिस झाला तरी वाचते दृष्टी
कोरोनातून बरे झालेल्या बहुतांशी रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झालेली आहे. हा संसर्ग नाक, डोळे, जबडा आणि मेंदू यांना बाधित करतो. या आजाराची लागण झालेल्या बहुतांशी जणांना दृष्टीदोष झाला आहे. मात्र या आजाराचे तत्काळ निदान होऊन योग्य उपचार झाले तर दृृष्टीवर काहीच परिणाम होत नाही. डोळे पहिल्यासारखेच व्यवस्थित राहतात. अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. भूषण अनभुले यांनी दिली.
-----------------
कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अवयव दान करून घेणे शक्य नाही. मात्र बहुतांशी जणांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिलेला असतो. ही बाब त्याच्या नातेवाईकांना ही माहीत नसते, अशा व्यक्तींचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर त्याचा हा संकल्प पूर्ण होत नाही. यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कारणास्तव रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडून अर्ज भरून घेताना नेत्रदान करण्यासंदर्भात संकल्प केलेला आहे का, याची माहिती घेत आहोत.
डॉ. भूषण अनभुले, नेत्र विभागप्रमुख- जिल्हा रुग्णालय